रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

फॅंटम



फॅंटम
भारत-पाकिस्तान संबंध त्यांतील ताणतणावासकट हा आजकाल चित्रपट निर्मात्यांचा प्रेमानंतर दुसरा एक आवडता कमवून देणारा विषय बनलेला आहे याची प्रचीती देणारा एक चित्रपट म्हणजे फॅंटम.मुंबई इव्हेन्जर्स या हुसैन झैदी यांच्या कादंबरीवर आधारित कथानक आणि आजपर्यंत कधी ही कोणत्याही चित्रपटाच्या सुरवातीस न बघितलेले "न्युट्रल कथानक" असल्याचे डिस्क्लेमर सुरवातीला मिळते कारण हाफिज सईद ने टाकलेली केस. मान्य असो व नसो पण या केसमुळे भारतात या चित्रपटाला पुरेशी पूर्वप्रसिद्धी मिळवून दिली.इतकी कि कोणतही प्रमोशन करण्याची गरज निर्माते नाडियादवाला परिवार आणि सिद्धार्थ रॉय-कपूर ला भासली नाही यातच सगळ आलं. यावर्षी सुरवातीला आलेल्या अक्षय कुमारच्या बेबी मध्ये कदाचित पहिल्यांदा एका पात्रस्वरुपात मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड अन पाकिस्तानी कट्टरपंथी हाफिज सईद चे प्रेक्षकांना दर्शन घडले होते. या चित्रपटात त्याचे पुढचे पाऊल टाकत चक्क एक स्पष्ट पात्र म्हणून त्याचा समावेश केलेला आहे.
हाफिज सईद ने पाकिस्तानी सुप्रीम कोर्टात धाव घेत त्याच प्रदर्शन पाकिस्तानात का रोखलं असेल याच थोडफार उत्तर चित्रपटातून मिळते. स्पष्ट नाव न घेता पण इस्लाम च्या आडून पाकिस्तानी तरुण पिढीला कसा बहकवायचा प्रयत्न सदर इसम कसा यशस्वीपणे प्रयत्न करतो आहे हे कळते. भारत असो व पाकिस्तान लोकं हे चित्रपटसृष्टीला बरेच गांभीर्याने घेतात. त्याच्या लोकप्रियतेला पाकिस्तानात काही टक्के तरी ओहोटी लागण्याची शक्यता निश्चितच होती यातून. म्हणूनच कदाचित त्याने हे प्रदर्शन रोखलं असावं.
कहाणी:
२६-११ चा मुंबई हल्ला आणि त्या हल्ल्याला आपल्या रॉ मधल्या एका एजंट ने घेतलेला बदला/सूड अशी कहाणी. मुंबई हल्ल्यावर आजपर्यंत अनेक चित्रपट बनले. अमेरिकेत जर वर्ल्ड ट्रेड सेंटर चा ९-११ च्या हल्ल्यानंतर इतका गोंधळ उडून त्याची परिणीती ओसामाला शोधून,निवडून अमेरिकेने शिक्षा देण्यात होते तर २६-११ मुळे भारताला हे का जमत नाही अशी थियरी मांडून त्या सभोवताल फिरणारे हे कथानक.हि थियरी इमोशनली पटण्यासारखी असली तरी practically नाही. अमेरिकेचे जगाच्या राजकारणातील स्थान आणि अमेरिकन डॉलर अन भारतीय बापडा रुपया यातला फरक हा अतिशय स्पष्ट आहे. नाटक सिनेमात ठीक आहे पण हि कहाणी प्रत्यक्षात येण्यास अशक्य कारण माननीय पंतप्रधानांना आपण बहुमत तर दिले पण सोबत विरोधकही दिलेत. पण तरीही सैफ अली खानचा मृत्यू सोडून या कहाणीत मला काहीही वावगे वाटले नाही. भलेही प्रत्यक्षात येण्यास अशक्य का असेना पण चित्रपटांच्या कहाणीला काय सिरीयसली घ्यायचं??
अभिनय:
सैफ अली खान (दानियल खान) आणि कतरिना कैफ (नवाझ) हे दोघ एजंट. एक रॉचा एजंट आणि एक प्रायव्हेट रॉ आणि इतर सगळ्या देशांच्या एजन्सीजची अंडरकव्हर सपोर्टिंग एजंट टाईप. योगायोगाने एकमेकात मोहिमांच्या अनुषंगाने गुंतलेली नि आपोआप वाढलेली कहाणी. मुंबई हल्ला, हाफिज सईद आणि इस्लाम धर्म असल्या कदाचित वास्तविक पण स्ट्रीमलाईन कहाण्यांशी फटकून असणारी कहाणी असल्यामुळे यात अभिनय करणे हि कदाचित भविष्यकाळातील जीवाचा धोका बनण्याची रिस्क होती पण सगळ्याच कलाकारांनी व्यवस्थित निभावलेल कथानक.
दिग्दर्शन:
फॅंटम हे कबीर खान म्हणजेच एक था टायगर आणि बजरंगी भाईजान वाले. एकाच वर्षात दोन सुपरहिट (बजरंगी भाईजान आणि फॅंटम) देण्याइतके शुटींग-पोस्ट प्रोडक्शन-पास्ट प्रोडक्शन-प्रमोशन इत्यादी इत्यादी इव्हेण्ट्स मधून कसं वेळ management केलं असेल हे देवच जाणे. त्यांच्या ख्याती प्रमाणे सिनेमाचे पहिले दहा मिनिटे जे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला ताणण्यास जबाबदार असतात ते पुन्हा एकदा जबरदस्त पद्धतीने manage केलेलं आहे त्यांनी. वास्तविक बघता हाफिज सईद आणि पाकिस्तान यांच्यावर इस्लाम धर्माथ्रू टिप्पण्या असल्यामुळे नाही म्हटले तरी स्फोटक विषय होता हा. पण सांगण्यास कौतुक कि कबीर खान यांनी सगळ्या अनुभवाला व्यवस्थित पणाला लावून सगळ हाताळल आहे.
फॅंटम हे एक इंग्रजी काल्पनिक पात्र, batman-सुपरमन-शेरलॉक होम्स यांसारखे. त्याच्या ख्यातीप्रमाणे तो गायब असतो व जेंव्हा गरज पडते तेंव्हाच प्रकट होतो. याचप्रमाणे आपल्या फॅंटम मध्येही आपला नायक कहाणी घडण्याआधी काही वर्षे अदृश्य असतो (विविध कारणांनी) आणि कहाणी execute करायला प्रकटतो. कदाचित या कारणामुळे चित्रपटाचे नाव फॅंटम असावे.

मला चित्रपटाचे नाव हे का दिले हे समजले नाही, संगीत जवळपास नव्हतच आणि शेवटचा सैफ अली खानचा मूत्यू पटला नाही पण सगळ्या कमतरतेवर कडी करणारे दिग्दर्शन आणि अभिनय आवडला म्हणून मी चित्रपटला चार ४* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

दोन स्पेशल (मराठी नाटक)

दोन स्पेशल (मराठी नाटक) 
क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित नाटक “दोन स्पेशल” हे जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले यांच्या अभिनयाने प्रेमकथेच्या समकक्ष धाटणीत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे.मराठी नाटक आपण बघायला जातो तेंव्हा उपलब्ध दोन-तीन अंकात लेखक दिग्दर्शक पूर्ण कथा बसवतात आणि त्या कथेला उपलब्ध अभिनेता-अभिनेत्री आपापल्या अभिनयाने सजवतात. 
कहाणी: 
दोन स्पेशल हि दोन दुरावलेल्या प्रेमी जीवांची कथा असे कदाचित आपण म्हणू शकू. जितेंद्र जोशी हा एक पत्रकार-उपसंपादक आणि गिरीजा ओक हि त्याच कार्यालयातली त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी. या दोघांची दुरावण्याची कथा दोन अंकात फिरून शेवटी का दुरावलेत याचे त्या दोघांना उत्तर मिळून कथा संपते.
अभिनय:
मुळात कथा प्रेम कहाणी समकक्ष असे म्हटले कारण प्रेम कहाणी पूर्वाश्रमीची असल्यामुळे जराही तोल ढळू न देत जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले आपापल्या भूमिकांत पुरून उरतात. नाटकात सिनेमा सारखे टेक-रिटेक्स असे प्रकरण नसल्यामुळे कदाचित खराखुरा अभिनय असे नाटकाला म्हणता येईल. दोन स्पेशल मध्ये जितेंद्र जोशी पहिल्या अंकात आणि गिरीजा ओक-गोडबोले दुसर्या अंकात खरोखर एक एक संवाद म्हणतात जो कदाचित एका धड्याइतका असेल. हा महाप्रचंड संवाद सदर करताना दोघांचाही तोल ढळत नाही. कथेला पुढे सरकवण्यासाठी अतिशय मोक्याचे असलेले ते दोन वेगवेगळ्या अंकातील संवाद हे कठीण असूनही आपोआप नाटकाचा प्राण बनलेत.पूर्वाश्रमीची कथा एका नाटकात विशद करताना नाटकात flashback ची सोय नसल्यामुळे सगळे काही मंचावरील अभिनेत्यांच्या हातात असते कि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना कोणतेही कन्फ्युजन न व्हावे आणि लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित कथा प्रेक्षकांपर्यंत नीट पोचावी. पण सांगण्यात समाधान कि जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले हे कुठेही कमी पडत नाहीत.

दिग्दर्शन:
क्षितीज पटवर्धन हे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक. प्रेक्षकांना कन्फ्युज न होऊ देत कथा त्यांच्यापर्यंत पोचावी हा त्यांचा प्रयत्न बरेच ठिकाणी कळून येतो. फक्त नायक नायिकेच्या संवादांच्या सहाय्याने जेंव्हा दिग्दर्शकाला flashback उभा करायचा असतो तेंव्हा तो कसा उभा करावा याचे एक खरेखुरे प्रात्यक्षिक म्हणजे "दोन स्पेशल"

दोन स्पेशल हा बघावा जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले च्या अप्रतिम अभिनयासाठी. त्या दोघांच्या अभिनयासाठी मी हे नाटक रेकमंड करीन आणि मी नाटकाल पाचपैकी तीन ३* देईन माझ्याकडून बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

शोले



शोले 
शोले चित्रपटाला आज रिलीज होऊन अर्थात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याची संधी मिळून आज चाळीस वर्षे पूर्ण झाली. कधी कधी मी विचार करतो कि मला शोले का आवडला? १.आजूबाजूचे सगळे कौतुक करत असल्याचा तो मानसिक परिणाम असेल काय? कि २.खरच त्यातला अभिनय/संगीत/कथा/पात्रनिवड/पटकथा/संवाद मला आवडले असतील? पण विचार न करता मी दुसर्या पर्यायावर पोचतो करण शोले ज्या वयात बघितला ते वय इतरांचे ऐकून निर्णय घेणार्यापैकी नव्हत. लहान असल्यामुळे आवडला तर आवडला अन नाही आवडला तर नाही मग कुणालाही काहीही वाटो. अर्थात हि गोष्ट असल्यामुळे मला वाटते कि शोले त्यातल्या अनेकानेक वैशिष्ट्यांमुळे मला आवडला.

शोलेतला अभिनय हि शोलेची सर्वाधिक जमेची बाजू अस माझ मत आहे. सलीम-जावेद च्या कथा अन पटकथेला आर डी बर्मन च्या संगीत अन पार्श्वसंगीताने साज चढवला अन रमेश सिप्पीची पात्रनिवड अन दिग्दर्शनाने त्यावर कळस चढवला.अभिनयात शोले मध्ये सगळे-सगळे आपापल्या भूमिकांत शोभले अगदी गब्बर सिंग पासून ते अगदी छोटीशी भूमिका असलेल्या सुरमा भोपाली पर्यंत. अभिनयात कुणालाही काहीही बोट दाखवता येणार नाही असे चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत खूप कमी आहेत. पण जे आहेत त्यात शोले वरच्या क्रमांकावर आहे. आज मागे वळुन बघताना शोले चे कौतुक कशासाठी करावे अन कशासाठी नाही असा विचार लोकांना पडतो यातच शोलेचे यश सामावलेले आहे.

भारतीय सिनेसृष्टीत सर्व दृष्टीने परिपूर्ण असे दोनच चित्रपट सध्या मला वाटतात. हा कदाचित मला नसलेल्या अनुभवाचा परिणाम असेल किंवा नसलेल्या ज्ञानाचा. पण १. शोले आणि २ हम आप के है कौन हे दोन मला सर्व दृष्टीने पैसा वसूल चित्रपट वाटतात, पूर्ण कुटुंबाला नेऊ शकू असे आणि आजोबांपासून ते लहान भावांपर्यंत कुणीही कंटाळणार असे कारण सगळ्या वयांसाठी काही ना काही या दोन्ही चित्रपटात आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ला नुकतेच १००९ आठवडे पूर्ण झाल्याची बातमी नुकतीच कुठेतरी वाचली.याही चित्रपटाने असाच विक्रम नोंदवावा यासाठी सुपरस्टारला शुभेच्छा.
-समीर

शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

Mission: Impossible – Rogue Nation



Mission: Impossible – Rogue Nation 

आताच काही दिवसांपूर्वीच आपण आपला (हिंदी/भारतीय) मधल्या बाहुबली ला बघून प्रभास अन दग्गुबत्तीच्या फिजिकल फिटनेस अन स्टण्टस बद्दल त्यांचे झालेले कौतुक बघितले अन प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रित्या हॉलीवूडशी झालेली बरोबरीहि बघितली. पण हॉलीवूडचे फिजिकल स्टण्टस म्हणजे काय अन ते सर्वोत्तम कसे याचे उदाहरण प्रेक्षकांना दिसण्यासाठी लगोलग दाखल झालाय Mission: Impossible – Rogue Nation .

हा सिनेमा Tom क्रुज च्या या सिरीज मधला पाचवा भाग. कोणताही सिनेमा कुणीही का बघावा हा ज्याच्या त्याच्या टेस्टचा प्रश्न असतो. पण सदर पूर्ण सिरीज का बघावी? तर tom क्रुझ ने वयाच्या पन्नाशीत केलेले [कोणताही body डबल न वापरता केलेले] अविश्वसनीय फिजिकल स्टण्टस. पहिल्या भागापासूनच तो यात जबरदस्त जीव ओतून शोभून गेलाय या सिरीजमध्ये पण या वेळेस तो वयाच्या ५३ व्या वर्षी आपल्या हिंदी नायकांना शरम वाटावी असे कारनामे करून जातो.


कहाणी:
सिनेमा अमेरिकन. त्यामुळे सर्व दृष्टीने अमेरिकेची बाजू वरचढ ठरणारी स्टोरी लाइन पहिल्या भागापासूनच. त्यात सी आय ए, एफ बी आय इत्यादी इत्यादी त्यांच्या संस्थाना वरचढ ठरू बघणारी त्यांचीच एक इंटर्नल संस्था impossible मिशन फोर्स[आय एम एफ]. त्यात त्यांचे-त्यांचे आंतरिक राजकारण. त्या राजकारणात सुरु झालेली एकमेकांवर अब्जावधी बिलियनसाठी कुरघोडी करण्याची आंतरिक स्पर्धा. त्यात लागलेला "सिंडीकेट" चा शोध. अन या सिंडीकेटच्या मुळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न. हे सगळ करताना त्याच execution ऑन स्क्रीन कसे होते यावर प्रेक्षकांचे संतुलन सांभाळायची कसरत सगळ्याच भागात अप्रतिमरीत्या झालेली सापडते. कोणी/कस/काय/किती या हॉलीवूडच्या डीटेल्स मध्ये आपण न जाता फक्त एन्जॉय करण्याचे ठरवले तरीही कुठेही कमी न पडणारी एक अप्रतिम हॉलीवूड सिरीज.
अभिनय:
इथन हंट हा tom क्रुझचा रोल.पहिल्या भागापासूनच तो एक सिक्रेट एजंट. मग लगोलग या भूमिकेत विविध मोहिमा निभावताना त्याने केलेले अप्रतिम स्टण्टस. आपण आधीचे भाग जाऊ देऊ पण याच भागात अगदी सिनेमाच्या सुरवातीला त्याने हात मागे एक खांबाला बांधलेले असतानाही पूर्ण ३६० डिग्रीच्या कोनातून उडी घेऊन स्वत:ची त्याने करवून घेतलेली सुटका हे एक अगदी छोटसं उदाहरण. मग त्याने पुढे बाइक रेस, विमानाला लटकणे इत्यादी स्टण्टस स्वत:च कोणताही बॉडी डबल न घेत केलेले आहेत. मान्य असो वा नसो पण हॉलीवूड मध्ये भाव भावनांपेक्षा या इतर कलाकुसरीलाच प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्व असते आणि या मानकावर अगदी अप्रतिम रित्या उतरून तो एक सुपरस्टार असल्याचे स्वत:ला सिद्ध करतो.

आपल्या इथे आपण इतर कलाकुसरीला महत्व न देता भावभावनांना महत्व देतो. कदाचित हा भारतीय-अमेरिकन मानसिकतेमधील बेसिक फरक असावा.कारण काहीही असो पण माझ्यासारख्या एका सामान्य प्रेक्षकाने हॉलीवूडच्या मारधाडपटा कडून बाळगलेल्या सगळ्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करतो म्हणून मी पूर्ण पाच पैकी ५* देईन पाच पैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २ ऑगस्ट, २०१५

दृश्यम (Drishyam)




दृश्यम (Drishyam) [हिंदी]

हिंदी सिनेमा जेंव्हा आपण बघायला जातो तेंव्हा त्याचं नाव हे जास्तीत जास्त वेळा प्रेम या विषयावर बेतलेले असते. द्रिश्यम असे मुलत: संस्कृतवर बेतलेले टायटल दिले म्हणजे हे हिंदी प्रेक्षकांनी समजून जाव कि हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असावा. आणि तो आहेच. मोहनलाल या मलयालम सुपरस्टारच्या चित्रपटाचा हा रिमेक. 
कहाणी: 
दृश्यम हे असे टायटल का? कारण चित्रपटाचे टायटल हे कहाणीशीसंबंधित असते. तर त्यालाही कारण आहे. आपल्या स्मरणशक्तीवर जास्तीत जास्त छाप सोडणारी कल्पना कोणती? तर आपल्याला दिसणारे आपण बघितलेले अन अनुभवलेले दृश्य. कोणतीही गोष्ट जी दिसते ती आपण विसरत नाही. ती लक्षात राहते. या वास्तविकतेचा वापर करून एका सर्वसामान्य माणसाने न्यायाची लढलेली लढाई असे कदाचित आपण या कहाणीला म्हणू शकू.

अभिनय:

विजय साळगावकर (अजय देवगण) हा एक सर्वसामान्य व्यक्ती केबलचा धंदा करणारा. कमी शिकलेला.
एक बायको अन दोन मुली असणारा. या व्यक्तीला रंगवताना एक थ्रिलरपट असल्यामुळे प्रेम किंवा जबाबदारी या दोन्ही कल्पनांत वाहवत जाण्याचा चान्स अजय देवगण जवळ होता. पण त्याने अक्षरश: सराईत पणे या दोन्ही कन्सेप्ट्स ला व्यवस्थित हाताळून विजय साळगावकर पडद्यावर उभा केलेला आहे. स्वत:चा धंदा अन कौटुंबिक जबाबदार्या सांभाळताना एक सर्वसामान्य माणसाची चालणारी कसरत अन त्यातही पब्लिक रिलेशनशिप्स हाताळताना असणारा व्यवस्थितपणा हा खरोखर अप्रतिमरित्या अजय देवगनने उभा केलेला आहे. गोलमाल सिरीज अन सिंघम सिरीज या दोन सिरीज नंतर एक अभिनेता म्हणून अजय मध्ये अभिनय दृष्टीने आमुलाग्र बदल झालेला आहे. आणि मान्य असो व नसो याचे श्रेय रोहित शेट्टिचेच.
नंदिनी साळगावकर या श्रिया सरन ने उभ्या केलेल्या त्याच्या पत्नीचा उल्लेखही करावाच लागेल. आजपर्यंत श्रियाने हिंदीत जास्त छाप सोडलेली नाही. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत ती सुपरस्टार असेलही कदाचित पण हिंदीत तिचा आवर्जून बघण्यासारखा एकही सिनेमा नाही. फक्त एक दिसायला सुंदर अभिनेत्री म्हणून तिचा वापर काही चित्रपटात झालेला आहे इतकंच. पण या तिच्या इम्प्रेशनला १८० च्या कोनाने छेद देणारी भूमिका म्हणून भविष्यात नंदिनी साळगावकरचा उल्लेख होईल. दोन मुलींची आई आणि आपल्या मुलीवर संकट आल्यावर त्याचा समर्थपणे मुकाबला करून त्यातूनही लढलेली. दिसायला सुंदर ती आहेच पण जबाबदारी रंगवताना तिच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी आलेली आहे. आणि याच गोष्टीमुळे तिचा वावर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पहिल्या टाईमपास मधला दगडू देखील एका छोट्याश्या सहाय्यक भूमिकेत दर्शन देतो.
दिग्दर्शन:
निशिकांत कामत हे या थ्रिलरपटाचे दिग्दर्शक. आपल्या "लई भारी" आणि "डोंबिवली फास्ट" वाले. त्यांनी अतिशय अप्रतिमपणे एक कठीणशी कहाणी उभी केलेली आहे. एका सामान्य माणसाची आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटाला परतवताना जी घालमेल होते ती पडद्यावर चितारताना निशिकांत कामत बर्याच ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त वेळा वास्तविकतेला म्हणजेच दुसर्या शब्दात (practicality )ला महत्व दिलेला आहे. त्यामुळेच कदाचित प्रेक्षकांचा इंटरेस्ट टिकून राहतो. आणि चाकोरीबाहेर जाऊन या बाबीमुळेच कदाचित ते सफल होतात.
संगीत:
विशाल भारद्वाज यांचे संगीत आणि समीर फातरपेकर यांचे backround संगीत सिनेमाला आहे पण ते जरी शोभत असल तरी सुधारणेस बराच वाव होता.
"Don't underestimate the power of a common man" हा सुपरस्टार शाहरुख खानचा चेन्नई एक्सप्रेस या सिनेमातील गाजलेला डायलॉग. या फक्त एका डायलॉगला मिळती जुळती कहाणी भविष्यात एका थ्रिलरपटाच्या चेहर्यामोहर्याने कदाचित पडद्यावर उतरेल असे वाटलेही नसेल तेंव्हा शाहरुख खानला. पण आज दोनच वर्षात सुपरस्टारच्या फक्त एका गाजलेल्या डायलॉग वर बेस्ड पूर्ण तीन तासांचा चित्रपट बनला एक थ्रिलर कहाणीच्या रूपाने.
मला हा थ्रिलर पट आवडला पण यातले संगीत पटले नाही आणि सुधारणेस खूप वाव वाटला पण संगीत सोडून कोणतीही खोट जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला चार ४* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, १९ जुलै, २०१५

तुझे नि माझे नाते काय


तुझे नि माझे नाते काय?

महान कवी अन गीतकार संदीप खरे व शानदार संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांना आपण ओळखतो मुख्यत्वे आयुष्यावर बोलू काही या शानदार गाणे कवितांच्या कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमाचे जगभर जवळपास हजार प्रयोग केल्यावर हि जोडी तसाच एक दुसरा नजराणा रसिकांसाठी घेऊन आले आहेत. "तुझे नि माझे नाते काय?". "प्रेम" हा त्याच्या गाणे कवितांचा कधीही न संपणारा अन तुफान लोकप्रिय विषय. मग कविता वाचन अन गाणे यांचा एक असा कार्यक्रम असल्यास ज्यात मुख्य विषय म्हणजे प्रेम तर?

या कल्पनेचे मूर्त रूप म्हणजे "तुझे नि माझे नाते काय?"


बर मान्य कि प्रेम हा विषय असू दे पण मग फक्त तरुणाईचा ओढा राहील, बाकीच्या वयांबद्दल काय? तर याचे उत्तर म्हणून हे दोघंही प्रत्येक वयोगटात असणार्या प्रेम या संकल्पनेच्या विविध बाजूना या कार्यक्रमात स्पर्श करतात.टीनेजर अर्थात तरुण-मध्यमवयीन-आणि मोठे या सर्व वयोगटाना आपल्या गाणे-कवितात सामील करून सुवर्णमध्य साधलेला आहे.
आता आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमाशी अगदी नैसर्गिकपणे या कार्यक्रमाची तुलना होईलच. दोन्ही कार्यक्रमांचा सादरीकरणाचा format सारखाच आहे पण यावेळेस त्यांनी घेतलेला महत्वाचा बदल म्हणजे रंगमंचावरील उपस्थिती. आधीच्या कार्यक्रमात फक्त संदीप-सलील हे दोघंच स्टेजवर असायचे पण या कार्यक्रमात त्यांनी आपल्या सर्व वाद्यवृन्दाना आणि दोन गायिकांना स्टेजवर संमिलीत केलेले आहे, या दोन गायिकांमध्ये सौभाग्यवती सोनिया (संदीप) खरे यांचे देखील प्रेक्षकांना दर्शन घडते. मी बघितलेल्या आजच्या प्रयोग क्रमांक दोन मध्ये तरी त्या होत्या.
-समीर 

शनिवार, १८ जुलै, २०१५

बजरंगी भाईजान



बजरंगी भाईजान

मागच्याच पंधरवड्यात आपण एक आयडियल आणि अद्भुत दक्षिण भारतीय कलाकृती अनुभवली. मग आता या कलाकृतीला आपण हिंदीत आपल्या स्टाईलने टक्कर द्यायला नको? याच इच्छेला दमदार उत्तर देण्यासाठी आलाय बजरंगी भाईजान.एक परिपूर्ण अन उत्कृष्ट कलाकृती.
कहाणी:
मुन्नी (हर्षाली मल्होत्रा) हि एक पाकिस्तानी मुलगी. कर्मधर्मसंयोगाने चुकून पाकिस्तानातून भारतात हरवून येते आणि ती आपल्या पवन कुमार चतुर्वेदी उर्फ बजरंगी भाईजान (सलमान खान) ला सापडते.
तो आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीला तिच्या आईपर्यंत पाकिस्तानात कसा पोचवतो या मुख्य धाग्याभोवती गुंतलेली कहाणी म्हणजे बजरंगी भाईजान. आता कुणालाही शंका येईल कि त्यात काय विशेष म्हणून. आणि ते खरेही आहे पाकिस्तानात एका हरवलेल्या मुलीला पोचवणे यात काहीही तीर मारण्यासारख नाही. पण जर ती मुलगी मुकी असली तर? हो ती मुलगी मुकी असते!!! तिला काय म्हणायचं आहे हे समजून घेऊन एका मुक्या मुलीला तिच्या घरी पाकिस्तानात पोचवणे हा नक्कीच एका कहाणीचा विषय आहे. मग कहाणी हिंदी म्हणजे प्रेम,मैत्री,द्वेष इत्यादी इत्यादी भावना वेगवेगळ्या अनुषंगाने कथेत डोकावतात. गाणेही असतातच. पण भारतीय (हिंदी) मानसिकतेसाठी महत्वाच प्रकरण म्हणजे कहाणी. या एंड वर सलमानने पूर्ण यशस्वीपणे बाजी मारलेली आहे.
अभिनय:
सलमान खानचे कौतुक शब्दश: करावे तितके कमी इतके शानदारपणे त्याने पवन चतुर्वेदी उभा केलेला आहे. एका रिटायर्ड वेद विशारद पहलवानाचा मुलगा. पहलवानी आणि अभ्यासातही कमी. त्याच्या आयुष्यात अचानक घडलेला बदल. आयुष्यात झालेले नायिकेचे आगमन. आणि या सगळ्या कोलाहलातून त्याने केलेली मानवतेच्या पातळीवर एका मुक्या मुलीची मदत. करीना कपूर देखील एक नायिका म्हणून चित्रपटात आहे. पण तुम्ही बाहेर निघता तेंव्हा तुमच्या लक्षात राहतो तो सलमान आणि नवाजुद्दिन सिद्दिकी. वास्तविक बघता नवाजुद्दिन सिद्दिकी हा एका सहाय्यक भूमिकेत आहे आणि त्या भूमिकेचे कथेतले आगमनही मध्यंतरानंतर होते. पण बाहेर पडताना तुम्हाला लक्षात राहतो तो त्याने रंगवलेला सहाय्यक आणि सालमन हे दोघच बस. हर्षाली मल्होत्रा या छोकरीचे कौतुक केल्याशिवाय बजरंगी भाईजानच्या अभिनयाचा उल्लेखही भविष्यात होणार नाही इतकी छाप तिने सोडलेली आहे. तिने रंगवलेली शाहिदा (मुन्नी) हि एक मुकी मुलगी आईपासून दूर आणि आईच्या शोधात. वाचताना महत्व फक्त एका वाक्यात संपत असल तरी बघताना पूर्ण चित्रपट उभा राहिला राव तीन तासांचा. खरोखर छोकरी अक्षरश: शाहिदा म्हणून जगलेली आहे पूर्ण कहाणीभर
दिग्दर्शन:
कबीर खान या आपल्या एक था टायगर वाल्या शिपच्या कप्तानाला यावेळेस सलमानने स्वत: एक निर्माता बनल्यावर रिपीट केलेला आहे. एक था टायगर मध्ये देखील भारतीय आणि पंजाबी जासूस यांची प्रेमकहाणी अशी वेगळीच थीम होती. आणि या वेळेस तर कहाणी खूपच वेगळी होती. पण कबीर खान स्वत: कहाणी सहलेखक आणि पटकथा व संवाद लेखकही असल्यामुळे तो सर्व आघाड्यावर शीपचा कप्तान होता. वास्तविक बघता भारत-पाकिस्तान मधील दरीला आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात सांधणे असा एक स्तुत्य प्रयत्न होता. भारत आणि पाकिस्तानमधील सर्वसामान्य लोकांना हि दरी नकोय. त्यांना हवाय तो शांततेचा मार्ग. हा संदेश देताना समोर सलमान असल्यावर आणि किक व जय हो च्या अपयशानंतर सर्व नजर बजरंगी भाईजान वर असल्यावर इतक्या स्फोटक कहाणीला दमदारपणे पेलून दाखवणे म्हणून कबीर खानचे कौतुक करावेच लागेल.
त्याच्या दिग्दर्शन शैलीच्या वेगळेपणाचे एकच उदाहरण घेऊ, कोणत्याही कहाणीला प्रेक्षकांच्या आतपर्यंत झिरपण्यास कोणत्याही सिनेमाचे पहिले दहा मिनीट मुख्य भूमिका बजावतात. या दहा मिनटात समोर पडद्यावर कुणीही असू दे पण प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला पाहिजे. बजरंगीमध्ये पहिल्या दहा मिनटात सलमान नसतो पडद्यावर पण एका छोट्या मुलीला अप्रतिम रित्या हाताळून कबीर खान प्रेक्षकांना आपल्या खुर्चीवर पुढील तीन तास खिळवून ठेवतो. एक था टायगर मध्ये पहिल्या दहा मिटताच तो प्रेक्षकांना flash back थ्रू कहाणीच्या मुळावर नेतो. मान्य असू दे वा नसू दे पण हि नस जी कबीर खान ला गवसलेली आहे ती भविष्यात त्याला एक यशस्वी दिग्दर्शक पातळीवर नेईल हे नक्की.
संगीत:
बजरंगी भाईजान मध्ये संगीत प्रीतम चे आहे. वैयक्तिक रित्या प्रीतम जा मला नेहमीच वन सॉंग वंडर वाटत आला आहे . प्रीतम हा संगीत दिग्दर्शक असलेल्या बर्याचश्या सिनेमात केवळ एक गाण हे इतके अप्रतिम असते कि बर्याचदा केवळ ते गाणे कमर्शियल पातळीवर चालून जाते आणि बाकी ठणठणगोपाळ. धूम (टायटल सॉंग), रेस- १ (जरा जरा टच मी), ये जवानी है दिवानी (बदतमीज दिल) हे त्याची काही उदाहरणे. याही सिनेमात सगळेच गाणे आपापल्या जागी शोभतात पण आपल्या किर्तीनुसार एक गाणे अप्रतिम देऊन गेला आहे प्रीतम. अदनान सामी ची कौसर मुनीर लिखित गझल "भर दो झोली मेरी". या गाण्याचं सिच्युएशन इतक जबरदस्त होत आणि त्या गझलचे बोलही त्या प्रसंगाला साजेसे आहेत. सेल्फी ले ले सारखा "वेळ मारून ने" टाईप काम नाही. अदनान सामीने ती गझल अगदी अप्रतिम रित्या निभावलेली आहे. त्याच्या बुर्सटलेल्या वजनापेक्षाही ती गझल आणि त्याचे बोल प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

हिंदी सिनेमा कसा असतो? तर तो कहाणीवर अवलंबून असतो, त्या कहाणीला चारही अंगाने फुलवतो त्यातला कलाकारांचा अभिनय.पण हिंदी सिनेमा दक्षिण भारतीय सिनेमासारखा व्यक्तीपुजक नसल्यामुळे कहाणी जर प्रेक्षकांना भावली तर आणि फक्त तरच कोणत्याही सिनेमाला हिंदीत हिट असा दर्जा मिळतो. केवळ एखाद्या अभिनेत्याची उपस्थिती हे हिंदीत कमर्शियल यशस्वीतेतच लक्षण नसते. याच आपल्या मागच्या जय हो आणि किक या आपल्या मागील अपयशावरून सलमान खान ने जबरदस्त धडा घेऊन बजरंगी भाईजान आणलेला आहे. सर्व दृष्टीने परिपूर्ण असा हा हिंदी चित्रपट मला आवडला आणि नावं ठेवण्या इतकी कोणतीही गोष्ट यात जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला पूर्ण ५* देईन पाच पैकी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर