शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

मिस्टर एंड मिसेस सदाचारी (मराठी)





आशिष वाघ हे नवीन दिग्दर्शक मराठीत पदार्पण करीत असून मिस्टर एंड मिसेस सदाचारी हा सिनेमा घेऊन आलेले आहेत. टायटल वरून वाटत असल्याप्रमाणे सदैव चांगले आचरण करणारे जोडपे यासम काहीही प्रकार नसून मुख्य नायक "शिवा सदाचारी" आणि त्याची लग्नापर्यंतची हि कहाणी म्हणून नाव मिस्टर एंड मिसेस सदाचारी. वास्तविक बघता आशिष वाघ हे मराठी चित्रपट वितरण व्यवसायातील मोठे नाव पण यावेळेस स्वत:च दिग्दर्शक बनलेत. एका चित्रपट वितरकाला पटकथेच्या वेगाचा अंदाज नसावा हे दुर्दैवी!!! पण तसे घडलंय खर.

कहाणी:
शिवा सदाचारी (वैभव तत्ववादी) हा एक अभ्यासातल्या अपयशामुळे सतत वर्षानुवर्षे घरच्यांच्या आणि त्यातही मुख्यत्वे वडलांच्या रोषाला बळी पडलेला एक मुलगा. त्याला झालेले प्रेम. या प्रेमाची त्याने केलेली adjustment आणि सरतेशेवटी हुशार भावाला पछाडत घरच्या संकटात वडलाना केलेली मदत अशी एक खूपच कन्फ्युजिंग कहाणी यात बघायला मिळेल.

अभिनय:
शिवा सदाचारी (वैभव तत्ववादी) आणि प्रार्थना बेहेरे हे दोघे मुख्य भूमिकेत यात आहेत म्हणजेच मिस्टर आणि मिसेस. पण मोहन जोशी यांनीही शिवाच्या वडलांच्या भूमिकेत छाप सोडलेली आहे. वैभव म्हणजे मराठीतला सुपरस्टार एकदम अभिनयात "बाप" माणूस असे समजत कि काय पण पटकथा आणि कथालेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी त्याला इतके अति-महत्व दिलेले आहे कि बस. प्रेक्षक त्रासण्याइतके अति महत्व. मान्य कि बाजीराव-मस्तानी मध्ये चिमाजी अप्पाची भूमिका वैभवने अप्रतिम निभावली पण म्हणून तो लंगड्या कथा-पटकथेला तारून नेईल या अपेक्षेला काय म्हणावे?  प्रार्थना बेहेरेने "अती" न करता तिच्या वाट्याला आलेली भूमिका व्यवस्थित निभावलेली आहे. तिचे सौंदर्य हीच तिची अभिनयापेक्षाही जमेची बाजू आहे हे जाणून तिने तिच्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे. पण बाहेर निघताना लक्षात राहतात ते मोहन जोशीच. आधी आपल्या नावडत्या मुलाचा त्यांचा दुस्वास मग आयुष्याच्या उत्तरार्धात आवडत्या मुलाने वार्यावर सोडल्यावर नावडता मुलगा जेंव्हा सावरतो तेंव्हा ते जाणवल्यावर त्यांचे कबुल करणे हे प्रेक्षकांवर छाप सोडून जाते.

दिग्दर्शन:
आशिष वाघ हे चित्रपट वितरण व्यवसायातून चित्रपट दिग्दर्शनात उतरलेले आहेत. तरीही त्यांनी इतके विविध प्रयत्न एकसाथ करावे याचे अप्रूप. प्रेमकहाणी-मित्रमेळा-प्रेमासाठी नायकाची इतरांना मदत- शिवजयंती इत्यादी इत्यादी विविध कोनाने कहाणी तीनही तास त्यांनी फिरवलेली आहे. शेवटी शेवटी लव जिहाद कडेही कहाणी वाकेल अशी शंका "नीता" च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना येते पण आशिष वाघ तिथे दया करतात कदाचित प्रेक्षकांवर.  पण त्यांनी पहिलाच प्रयत्न पुरेपूर निभावण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे दक्षिण भारतीय पद्धतीचे फायटिंग सिवेन्सेस वगेरे जबरदस्त जुळून आलेत पण.....

संगीत:
संगीत या चित्रपटाचा एकमेव stong point. पंकज पडघन यांनी अप्रतिम संगीत दिलेले आहे सगळ्या गाण्यांना. पंकज पडघन म्हणजे दुनियादारी-तू हि रे-क्लासमेट्स-गुरु चे संगीत दिग्दर्शक. त्यांनी त्यांची संगीत दिग्दर्शक म्हणून ओळख आता निर्माण केली असून, भविष्यात अजय-अतुल नंतर मराठीत संगीत दिग्दर्शक म्हणून पंकज पडघन यांचे नाव आदर मिळवेल हे नक्की.  

मराठीत सगळंच उत्तम असावे लागते आणि थोडीशीही काडी इकडची तिकडे झाली तर मराठीत जमत नाही. एका पूर्वाश्रमीच्या चित्रपट वितरकाकडून संथ पटकथा हि चूक नव्हे गुन्हा घडलेला आहे या चित्रपटात म्हणून हा चित्रपट फक्त उत्कृष्ट संगीताच्या शिदोरीवर तरून जाईल काय?? याचे उत्तर काळ देइलच पण मी संगीत आवडले म्हणू पाव (१/४)* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर     

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

घायल वन्स अगेन



सनी देओलचा राजकुमार संतोषीचा नव्वदीच्या दशकातला गाजलेला सिनेमा म्हणजे घायल. त्याचा पार्ट 2  म्हणजेच सिक्वेल घेऊन आणि त्याला म्हणजेच ज्येष्ठ पुत्र सनी देओललाच दिग्दर्शक बनवून घेऊन आलेत धर्मेंद्र. मागचा घायल हि त्यांचीच निर्मिती आणि सिक्वेल देखील त्यांचाच. मागच्या घायल मध्ये अमरीश पुरी ची व्यक्तिरेखा प्रचंssssड गाजली होती. एक नायक म्हणून सनी देओल प्रेक्षकांना जितका लक्षात राहिला तितकाच एक खलनायक म्हणून अमरीश पुरी. हा सिनेमा तशी जादू करू शकेल काय? याचे उत्तर काळच देईल पण सनी देओलने जर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण कमर्शियलि केले तर action सिक्वेन्सेस साठी रोहित शेट्टीला एक प्रबळ प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याची प्रेक्षकांची खात्री पटते.
मागील घायल मधल्या नायिकेच्या म्हणजेच मीनाक्षी शेषाद्रीच्या एका वाक्यावरून सिक्वेल मध्ये पूर्ण कहाणी ओढलेली आहे. मागील घायलचा संदर्भ तितकाच एका वाक्यापुरता पण पूर्ण कहाणी उभी राहिली तीन तासांची एका वाक्यावर. मग नव्या दमाचे तरुणाईचे प्रतिनिधी वगेरे संमिलीत करून छानपैकी एक कहाणी यशस्वीपणे सनी देओलने उभी केली. झालेला अन्याय, अन्यायाविरुद्ध पेटलेली तरुणाई असा माल मसाला पेरून त्यात मुख्य भूमिकेत स्वत:च असल्यावर स्वत:च्या तारस्वरातील डायलॉग डिलीव्हरीलाही मस्तपैकी सनीने स्कोप ठेवलेला आहे. कहाणीत तरुणाईचा समावेश करून त्यांचे अन्यायाविरुद्ध पेटून उठणे नाटकी आहे कि काय अशी प्रेक्षकांना शंका येण्याइतपत नाट्यमयता आहे. हि शंका प्रेक्षकांना कितपत येईल/येईल कि नाही यावर सिनेमाचे भवितव्य ठरेल??
अभिनयासाठी सनी देओल म्हणजे मागच्याच घायल १ मधला अजय मेहरा आहे पण या वेळेस बळवंत राय मागच्या भागात अन खर्या आयुष्यातही अमरीशजीनचा मृत्यू झाल्यामुळे नाही. सनी देओल मागील भागात अन्यायाविरुद्ध पेटलेला एक वकील असतो, तारीख पे तारीख वगेरे त्याचे संवाद आजपर्यंत प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या वेळेस थीम तीच असली तरी आता स्वत: दिग्दर्शक बनल्यावर कथेच्या मागणीनुसार त्याने तरुण चेहर्यांचा कथेत समावेश केलेला आहे. पण वयाचा जो फरक पडायचा तो अजय मेहरावर पडतोच पडतो. कथेनुसार त्याचे वय वाढलेले आहेच पण स्वत:च दिग्दर्शक असल्यावर/मुळे त्याने जर अती-आत्मविश्वासाने आपल्या संवादांना म्हणजेच त्याच्या बाबतीत डायलॉग डीलीव्हरीला महत्व दिलेले आहे. त्याची संवाद फेक हि काही विशिष्ट प्रसंगात चालून जाते, घायल-गदर वगेरे काही केसमध्ये चालून गेली पण प्रत्येकच वेळेस ती चालून जाईल या आत्मविश्वासाला मुजरा!!!! अनिल शर्मासारखा एखादाच असतो जो शून्यातून विश्व उभे करू शकतो!!!

सनी देओल स्वत:च दिग्दर्शक आहे. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे दिग्दर्शन शैलीवगेरे डीटेल्स आपण जाऊ देऊ आणि इमोशनल म्हणजेच भावनात्मक प्रसंग साकारण्यातला अननुभवहि दुर्लक्षित करू पण एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. आणि तो म्हणजे फायटिंग सिक्वेन्सेस अर्थात action सिवेन्सेस. action सिवेन्सेस मध्ये रोहित शेट्टीचा हातखंडा आहे पण त्याला टक्कर कोणी देईल तर दिग्दर्शक म्हणून भविष्यात तर सनी देओल. सनी देओलने जर टायगर श्रॉफ सारख्या फिजिकली फिट अभिनेत्याला घेऊन जर एखाद्या चांगल्या कथेची/संगीताची जोड दिली तर कदाचित एक चांगली कथा साकारू शकेल तो हे प्रेक्षकांना वाटून गेल्याशिवाय राहत नाही.   
संगीतासाठी या वेळेस दोन जोड्या वापरल्यात पण बाप्पिदासारखी मजा सिक्वेल मध्ये नाही हे नक्की.

घायल वन्स अगेन जर सनी देओल आवडत असेल तर आवडण्याचा खूप चान्स आहे आणि टाईमपास करायचा असेल तर कदाचित भ्रमनिरास होण्याचा धोका आहे. माझा झाला पण सनी देओलची दिग्दर्शन शैली मला आवडली खासकरून action सिक्वेन्सेस म्हणून मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

सोमवार, २५ जानेवारी, २०१६

गुरु (मराठी)


गुरु (मराठी)

मराठीतले करिष्माई दिग्दर्शक संजय जाधव त्यांच्या ‘दुनियादारी’ आणि ‘तू ही रेया मागील वर्षीच्या  सिनेमांच्या यशानंतर आता  ‘गुरू’ हा नवा सिनेमा घेऊन आलेले आहेत. मराठी सिनेमाचा एकूणच प्रेक्षकवर्ग बघता हा सगळा इत्यंभूत विचारशील प्रेक्षकवर्ग असतो त्यामुळे दक्षिण भारतीय पद्धतीच्या कथा पडद्यावर मांडल्यावर प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतील हे बघण्यासारखे राहील. दुनियादारी अन तू हि रे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून गेले. कदाचित त्यामुळे या चित्रपटाची पब्लिसिटी इतर मराठी सिनेमांपेक्षा भरपूर होत असल्याचे जाणवले. त्यात दिग्दर्शक संजय जाधव हेच स्वत: निर्माता जोडीपैकी एक निर्माता बनलेत या सिनेमासाठी त्यामुळेही कदाचित फरक पडला असावा. कारण काहीही असो पण पब्लिसिटी इतक्या प्रमाणावर आहे कि बस.

संजय जाधव यांनी दुनियादारी मध्ये तरुणाई अन तू हि रे मध्ये प्रेम व्यवस्थित हाताळल होत. इतर मराठी दिग्दर्शकांपेक्षा निश्चितच उत्तम रीतीने. गुरु मध्ये संजयजी स्वत:च लेखक जोडीपैकी एक (आशिष पाठारे सोबत) असल्यामुळे कि काय पण कहाणीत एकदम नवीन विषय निवडला आहे. पहिल्या पंधरा मिनिटात "गुन्हेगारी विश्वाकडे" वळणारी कथा असे इम्प्रेशन देणारी कहाणी नंतर उर्मिला कोठारेच्या कथेतल्या आगमनानंतर "प्रेमाकडे" वळली असे वाटते आणि मध्यंतरापर्यंत पोचेपर्यंत स्थलांतरितांच्या प्रश्नांना हात घालते. कितीही नाही म्हटल तरी इतक्या शिताफीने इतक transformation आणि ते हि मराठीत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या या विषयांना मांडणी करून प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत याची काळजी ही संजयजींनी घेतल्याचे बरेचदा जाणवते. या कहाणीचा शेवट कसा होतो हे निश्चितच बघण्यासारखे आहे कारण त्यातही मुरली शर्मा या हिंदीतल्या कसदार रंगमंच अभिनेत्याला खलनायक म्हणून मराठीत संजयजींनी गळाला लावून बाजी मारलेली आहे. मुरली शर्मा मराठी उच्चारात कोठेही कमी पडत नाही आणि खलनायक म्हणून छाप सोडून जातो.

संजयजिचा मराठी चित्रपट म्हणजे स्वनिल जोशी अन सई ताम्हणकरची जोडी अस आजवर समीकरण होत. त्यांनी एकाच वर्षात दोनदा तिकीटबारीवर हे समीकरण गाजवूनही दाखवल. पण गुरु मध्ये मात्र समीकरण बदलून दुनीयादारीतला दिग्या म्हणजेच सुपरस्टार अंकुश चौधरीला मुख्य अभिनेता म्हणून पुढे आणलेले आहे. अंकुश चौधरीचे कौतुक कारण त्याने दिग्दर्शकाच्या नवीन प्रयोगाला साथ देत मराठी चित्रपटात दक्षिण भारतीय पद्धतीचे फायटिंग सिक्वेन्सेस पेलून दाखवले. फायटिंग सिक्वेन्सेस बघून असे वाटले कि दक्षिण बारतीय पध्दतीप्रमाणे नायकप्रधान शेवट असेल पण तेथेच कदाचित संजयजी मधलं मराठीपण जागलं आणि मराठी पद्धतीप्रमाणे त्यांनी कथेचा शेवट करवला.  दुनियादारी मधल्या मीनूचे  म्हणजेच उर्मिला कानेटकरचे  ओवी या नावाने नायिका म्हणून  प्रेक्षकांना दर्शन घडते. तिने तिचा वाटा व्यवस्थित निभावला असून एका मुख्य अभिनेत्रीचे पात्र व्यवस्थित निभावलेले आहे.पण विशेष कौतुक अभिनयासाठी खलनायक मुरली शर्माचे कारण त्याने मराठीतला नसूनही मराठीत व्यवस्थित सगळ हाताळलेल आहे.   
  
संगीत हा मराठी प्रेक्षकांसाठी जिवाभावाचा विषय कारण मराठीत संगीत असते ते गाण्यांना म्हणजेच बेसिकली कवितांना आणि झुक्या रोजच दर्शन घडवतो कि मराठीत कवी-कवियित्री किती मुबलक आहेत याचे. पण सांगण्यास खरोखर आनद कि अमितराज-पंकज पडघन आणि प्रफुल्ल कार्लेकर असे तीन संगीत दिग्दर्शक असूनही संगीत उच्च पातळीचे आहे. दुनियादारी आणि तू हि रे मध्ये संगीत हे उच्च दर्जाचे होते. तीच संगीताची क्वालिटी संजयदाने गुरु मध्येही मेंटेन केली आहे स्वत: निर्माता बनल्यावर सुद्धा. "फिल्मी" आणि "mango डॉली" या दोन गाण्यांचा विशेष उल्लेख संगीतासाठी होइल.

फिल्म इंडस्ट्रीत  गुरु म्हटला कि  आधी आठवायचा मणिरत्नमचा आणि अभिषेक बच्चनच गुरु जो रहमानने सजवला होता. आपला मराठीतला गुरु अगदी तितका उच्च पातळीवर पोचला नसला तरी नेहमीसारखा विस्मृतीतही जाणार नाही. मला हा चित्रपट दिग्दर्शन-कहाणी आणि विशेष म्हणजे संगीत या साठी आवडला म्हणून मी चित्रपटाला ३.५ * देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर         

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

एयरलिफ़्ट



एयरलिफ़्ट

तेलाच्या भांडणात, सद्दामच्या सुवर्णकाळात, इराकने कुवैतवर आक्रमण केले, त्या काळात कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी कदाचित मानवी इतिहासातील सगळ्यात मोठी सुटका मोहीम (Evacuation) आखण्यात आली होती. जरा इकडे-तिकडे वाचन करण्याची सवय असेल तर या मोहिमेचे  कौतुक बरेच ठिकाणी बघितले असेल. या कथेपासून प्रेरित होऊन अक्षय कुमार त्या कथेवर बेस्ड सिनेमा घेऊन आला असून एक मनापासून केलेला चांगला प्रयत्न असे याचे वर्णन करता येईल. या मोहिमेत जवळपास दिड लाख लोकांना सुरक्षित स्थळी म्हणजे भारतात २०० विमानांच्या सहाय्याने आणण्यात आले होते असे मी वाचले होते, म्हणून मला उत्सुकता होती कि तितकी adjustment शुटींग मध्ये दिग्दर्शकाने कशी केली असेल पण चित्रपटात हजाराच्या आसपास व्यक्ती होते. कदाचित तितका practical बदल cinematic लिबर्टी म्हणून दिग्दर्शकाने घेतला असावा.

कहाणी:
१९९० साली १५ बिलियन डॉलरचे कर्ज इराकवर कुवैतचे होते. या कर्जाला चुकवणे तर दूरच पण वेगवेगळ्या कारणांना उकरून काढून इराकने कुवैतवर आक्रमण केले होते. त्या काळात बरेचसे भारतीय पोटापाण्यासाठी कुवैतमध्ये गेले होते, साहजिकच ते युद्धात फसले. त्या लोकांना सोडवून सुरक्षितपणे परत आणण्यासाठी "ऑपरेशन सेफ होमकमिंग" नावाची जी मोहीम आखण्यात आली होती त्या मोहिमेचे पडद्यावर रेखाटन करण्याचा प्रयत्न म्हणजे एयरलिफ़्ट. 
         
अभिनय:
अक्षय कुमार यात रणजीत कट्याल या व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे जो सगळ्यांना व्यवस्थित सोडवून परत आणतो. हि बहुधा काल्पनिक भूमिका असावी कारण मी तरी या व्यक्तीचे नाव कुठेही वाचले नाही. अक्षय कुमार एक खरा प्रोफेशनल अभिनेता कारण तो या मोहिमेचे नेतृत्व करणारा व्यावसायिक म्हणून शोभून गेला चित्रपटभर. एक उच्चपदस्थ दुसर्या देशात जाऊन प्रसंग आल्यावर भारतीय म्हणून भारतीयांच्या मदतीला धावून गेलेला व्यक्ती हि विचित्र सिच्युएशन अक्षय कुमारने एका अभिनेत्याच्या सराईतपणे हाताळली. नेतृत्व करत असताना त्याला येणारे अनेकानेक प्रॉब्लेम्स, ते सोडवताना त्याची दमछाक इत्यादी व्यवस्थित साकारले अक्षयने. आधीच्या काळात मनोज कुमार प्रसिद्ध होता कि जो फक्त देशभक्तीपर कहाणी असलेले चित्रपट आणून चालवून दाखवायचा. सध्याच्या पिढीत मला वाटते अक्षय कुमार त्याच मार्गावर चालायला लागलेला आहे.

दिग्दर्शन:
 राजा कृष्ण मेनन हे दिग्दर्शक आहेत एयरलिफ़्टचे, त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात खूप मोठा विषय हाताळण्याची हिम्मत त्यांनी दाखवलेली आहे आणि त्यात कुठेही ते कमी पडत नाहीत. दीड लाखांची व्यक्तीसंख्या शुटींगसाठी सोयीचे म्हणून हजारावर खाली आणणे हि सगळ्यात मोठी adjustment त्यांनी केली. या चलाखीला कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही कारण १९९० म्हणजे जवळपास २६-२७ वर्षे मागे जाऊन उकरून काढण्याइतका उत्साह कोणीही दाखवणार नाही. पण त्या मोहिमेत श्री.बेदी नावाचे केंद्र सरकारचे विदेश मंत्रालयातील एक आयएएस  अधिकारी होते. त्यांनी प्रचंड मेहनत/मदत/भारतातील नेतृत्व इत्यादी केले होते असे वाचल्याचे मला पक्के आठवते. त्यांचा सिनेमात उल्लेख नाही. हे मला चुकीचे वाटले कारण सुरवातीला तुम्ही रियल लाइफ़ बेस्ड अशी पाटी देता आणि अशी कन्नी मारता. पण कदाचित माझा जो सोर्स होता तो faulty असेल किंवा यांचे महत्व कहाणीत तितकेसे नसेल. 

संगीत:
सुरवातीचे एक आयटम सॉंग सोडले तर चित्रपटात गाणेच नाही. पण ती कमी दोन्ही  संगीत दिग्दर्शक अंकित तिवारी आणि अमाल मलिक यांनी पार्श्वसंगीतात भरून काढलेली आहे कारण पार्श्वसंगीताचा मुबलक वापर चित्रपटभर आहे. 

कोणताही मालमसाला नसलेले अन मुख्य म्हणजे संगीत विरहीत पूर्णपणे कहाणीवर अवलंबून असलेले चित्रपट खूप कमी असतात,एयरलिफ्ट त्यापैकीच एक. मला चित्रपट आवडला म्हणून मी चित्रपटाला ३(तीन) * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

कार्टी काळजात घुसली


कार्टी काळजात घुसली (मराठी नाटक)

प्रशांत दामले fan फाउंडेशन या नावाने निर्मात्या सौ गौरी प्रशांत दामले या नवीन नाटक घेऊन आल्या असून एक उत्तम प्रयत्न असे या नाटकाचे वर्णन करता येईल.वसंत सबनीस हे या नाटकाचे लेखक असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचललेली आहे.होणार सून मधली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान या नाटकात मुख्य स्त्री भूमिकेत असून नाटक म्हणजे एखाद्या मालिकेसारख (वेळकाढू) प्रकरण नसून एक लाइव्ह अभिनय प्रकरण आहे हे समजून-उमजून तिने प्रशांतजींना समर्थपणे साथ दिलेली आहे.

कहाणी:
कार्टी काळजात घुसली म्हणजे बापापासून दुरावलेल्या एका मुलीची कथा जी आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते. वास्तविक बघता तेजश्री प्रधान हि नाटकात नायिका आहे असे म्हटल्यावर तिची आणि प्रशांतजींची जोडी कशी जमवली असेल याबाबत प्रेक्षकांना उत्कंठा वाटणे साहजिक आहे. पण लेखक वसंत सबनीस यांनी हि उत्कंठा पुरेपूर शमवली असून पहिल्या पंधरा मिनिटातच उत्तर मिळते प्रेक्षकांना.

अभिनय:
नाटकाभीनयाचे जागतिक विक्रमकर्ता प्रशांत दामले  हे संगीतकार के के आणि तेजश्री प्रधान हि त्यांची मुलगी कांचन यांच्या भूमिकेत असून त्या दोघांनी आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे.

प्रशांत दामले यांच्या केके चा उल्लेख विशेष करून त्यांच्या विनोदाच्या टायमिंग साठी. मान्य कि नाटक लिखित संहितेत असते पण तरीही त्यातील विनोदाला लाइव्ह प्रेक्षकांसमोर उभा करणे कथेतील विनोदाच्या टायमिंग चुकू देता आणि नाटकाचा मूळ विषय बघता मुळातील गंभीरतेच्या गाभ्याला धक्का लागू देता हे मुख्य अभिनेत्यासाठी निश्चितच कौतुकास्पद. प्रशांतजींचे कांचनसोबतचे काही प्रसंग हे कथेला पुढे सरकवण्यासाठी भावनात्मकदृष्ट्या आव्हानात्मक होते. ते हि त्यांनी अप्रतिम रित्या निभावून नेलेत. म्हणजे एकच व्यक्ती तीन तासांच्या तुटपुंज्या वेळात रंगमंचावर लाइव्ह प्रेक्षकांसमोर भावनात्मक (इमोशनल) प्रसंग निभावतो आणि संहितेतील विनोदाच्या फोडणीलाही पुरून उरतो हे निश्चितच कौतुकास्पद आहे.  आणि याच सोबत काही प्रसंगात प्रेक्षकांना त्यांच्या गायनकलेचेही दर्शन घडते

तेजश्री प्रधान हिने रंगवलेली भूमिका म्हणजे कांचन१८ वर्षांपासून वडलांपासून दुरावलेली एक मुलगी जेंव्हा परत आपल्या वडिलांना भेटते तेंव्हाची एका मुलीची दोलायमान मन:स्थिती तेजश्रीने अप्रतिम रित्या उभी केलेली आहे. काही प्रसंगात तिची भूमिका कथेला पुढे नेण्यासाठी एक सपोर्ट इतकीच मर्यादित आहे तर काही प्रसंग पूर्ण तिच्या भूमिकेच्या गांभीर्यावर उभे आहेत पण सांगण्यास कौतुक कि तिने समर्थपणे सगळे प्रसंग तोलले आणि निभावून नेलेले आहेत. होणार सून मधल्या जान्हवीमुळे तिला घरोघरी प्रसिद्धी मिळाली पण या नाटकामुळे तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळेल.

कोणत्याही नाटकात पटकथा एक महत्वाची भूमिका बजावते. या नाटकात भावनात्मक प्रसंग उभे करण्यात पटकथा आणि संवाद लेखक कमी पडले अशी शंका प्रेक्षकांना बाहेर निघताना येते. अर्थात व्यक्ती-दरव्यक्ती आकलन करण्याचा फरक असल्यामुळे असेल कदाचित पण मला असे वाटले म्हणून मी या नाटकाला प्रशांतजी आणि तेजश्री दोघांच्या अभिनयासाठी साडे तीन   [ /]* दिन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर                 

सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

बाजीराव-मस्तानी


बाजीराव-मस्तानी

बाजीराव मस्तानी या दोघांवर सोशल साईट्सवर इतकी चर्चा घडलेली आहे कि या सिनेमाचा इतिहासाशी, ब्राह्मणांशी संबंध हे सोडून फक्त एक कलाकृती म्हणून याच एनालिसिस होण कठीण वाटते आहे पण तरीही संजय लीला भन्साळीला या अप्रतिम कलाकृतीबद्दल श्रेय हे विरोधकही देतील याचा भरवसा वाटतो. 

बाजीराव पेशवे हे शूर योद्धे होते हे मान्य पण त्यांच्याबद्दल महाराष्ट्राबाहेर त्यांचा उल्लेख शूर म्हणून न होता मस्तानी प्रकरणामुळे होतो. मी स्वत: गुजरात मध्ये काही वर्ष काढलेली आहेत आणि हे अनुभवलेलं आहे. त्यांची ब्राह्मण जात आणि मस्तानी या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांच्या शुरत्वावर कडी करतो हे मी बघितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी संजय लीला भन्साळी यांचे या मराठी मानसिकतेला अवघड विषयाला हात घातल्याबद्दल कौतुक कारण त्यांनी पूर्ण सिनेमात बाजीरावांचे  मस्तानीवर प्रेम होते ती त्यांची रखेल-अंगवस्त्र नव्हती  या वास्तविकतेवर भन्साळींनी फोकस केलेला आहे. बाजीरावांची मस्तानीशी झालेली पहिली भेट इथपासून सुरवात करून त्यांचे रंगलेले प्रेम इत्यादी अवघड विषयाला अप्रतिमरीत्या भन्साळीने हाताळलेल आहे.

बाजीराव पेशवे यांची झालेली मस्तानी या नर्तकीशी भेट अन त्या मस्तानीला तिच्या वडलांनी बाजीरावांना  केलेले नजर. तिचा पुण्यात/त्यांच्या घरात प्रवेश आणि शेवटी दोघांचाही झालेला (वेगवेगळा) मृत्यू या धाग्याभोवती विविध अंगाने फुलणारी कहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानी.नागनाथ इनामदार यांच्या "राऊ" या पुस्तकावर बेतलेली कहाणी असा उल्लेख पहिल्यांदाच आहे. मला अपेक्षा होती कि आधी घडलेला गदारोळ बघता भन्साळी "काल्पनिक कथा वास्तविकतेशी संबंध नाही" अशी सूचना आधी देईल. पण तसे काहीही घडले नाही.

काशीबाई साहेबांचा या कहाणीत आपोआप प्रवेश होतो कारण त्या श्रीमंतांच्या प्रथम पत्नी. त्यांचे आगमन कथेत झालावरही कथा मस्तानी आणि मस्तानीवर भाळलेला बाजीराव अशी न झुकता बाजीरावांचे शौर्य या गोष्टींवर फोकस करते या साठी भन्साळीचे खरोखर कौतुक.

बाजीरावांनी अवघ्या चाळीस वर्षांच्या जीवनात जवळपास सगळ्या प्रकारचे युद्धकौशल्य आत्मसात केले होते. मैदानी युद्धकलांत तर ते निपुण होतेच पण राजकारणी बाजूनेहि ते तरबेज होते. कथेत ओझरताच उल्लेख असला तरी निजामावर त्यांनी मिळवलेला विजय हा  त्यांच्या कुटनिति अन कावेबाज डावपेचात्मक राजकारणाचा अप्रतीम नमुना होता/आहे, अगदी फिरंग्यांनी त्यांच्या केम्ब्रिज विद्यापीठात अभ्यासण्याइतका. असल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला पडद्यावर उभे करणे हि  निश्चितच एक  कठीण गोष्ट होती. पण रणवीर सिंग कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या अभिनयात्मक कारकिर्दीतील अप्रतिम कामगिरी यात करून गेलाय. मस्तानीच्या प्रेमात पडलेला पण स्त्रीलंपट नसलेला अशी त्यांची योग्य अशी प्रतिमा रणवीर सिंग मुळे निर्माण होण्यास मदत होईल हे नक्की.

मस्तानीच्या भूमिकेत आहे दीपिका पदुकोण. मस्तानी हि रखेल नव्हती पण तिचा आणि श्रीमंतांचा विवाह झालेला होता असा उल्लेख भन्साळीला कदाचित इतिहासात सापडला नसावा. कारण त्या दोघांचा विवाह झाल्याच्या उल्लेख/प्रसंग सिनेमात नाही. पण श्रीमंत ज्या व्यक्तिमत्वावर भाळले असतील असे व्यक्तिमत्व पडद्यावर उभे करण्यात मात्र दीपिका पदुकोण यशस्वी होते हे नक्की. आपल्या सौंदर्याचा अभिमान असलेली एक स्त्री, युद्धकलानिपुण पण श्रीमंतांच्या रूपावर/व्यक्तिमत्वावर भाळलेली स्त्री उभे करणे हे एक कठीण काम होते, नानासाहेबांचे व्यक्तिमत्व कथेत आल्यावर त्यांच्या रूपाने त्यांच्यासकट सगळ्या पेशवे घराण्याचा विरोध सहन करताना श्रीमंतांवर  असलेली  निष्ठा  डळमळीत न होऊ देणारी स्त्री असल्या छटा फक्त तीन तासांत एका अभिनेत्याने पडद्यावर उभ्या करणे हे किचकट काम होते. पण दीपिका पुरून उरली दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर हे नक्की.  

काशीबाई राणीसाहेबांच्या   भूमिकेत आहेत प्रियंका चोप्रा. काशीबाईंची भूमिकाही एक कठीण भूमिका होती. घरात नवर्याला होत असलेला विरोध कमी करण्याचा प्रयत्न करत नवर्याच्या चुका पोटात घालून त्याला तोलामोलाची साथ देणारी एक कुलीन भार्या प्रियंकाने शब्दश: पडद्यावर उभी केलेली आहे. मस्तानीला समजून घेणारी पण तिने तिच्या मोठ्या बहिणीचा दर्जा देताच त्या दर्जाला नाकारणारी अन फक्त पतीपेमाने तुला आपलंस करते आहे हे तिला जाणवून देणारी राणी अप्रतिम रित्या प्रियंकाने उभी केलेली आहे.       

पिंगा अन मल्हारी या गाण्याला विविध कारणाने विरोध झाला. या गाण्यामुळे प्रतिमा खालावतेय या अन अश्या आशयाच्या पतिक्रिया मी तथाकथित पेशव्यांच्या वंशजांकडून वाहिन्यांवर बघितल्या. हे दोन गाणे अन माननीय काशीबाई साहेबांची प्रतिमा उभारण्यात दिग्दर्शकाने घेतलेली cinematic लिबर्टी आपण दुर्लक्षित करू पण तीन तासांची एक अप्रतिम ऐतिहासिक कथा विनादोष निर्माण करण्यात संजय लीला भन्साळी हे यशस्वी झालेत याचा आनंद होऊन मी चित्रपट ४१/२* (साडेचार) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर                     


रविवार, ६ डिसेंबर, २०१५

उर्फी-मराठी चित्रपट


लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान हे प्रथमेश परब (आपला टाईमपास मधला दगडू)  आणि नवीन तारका मिताली मयेकर यांना नवीन चित्रपटात घेऊन आले आहेत. मराठी चित्रपटाचा जीव म्हणजे "प्रेम" तर यात आहेच पण या बरोबरच मैत्री, कुंभमेळा आणि दहशवाद असल्या पूर्णपणे विरुद्ध कोनी विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो. प्रयत्न चांगला असला तरी प्रेक्षक कितपत स्वीकारतात हे बघणेबल राहील.
विक्रम प्रधान किंवा स्वत: प्रथमेश परब या दोघांपैकी कुणीतरी किंवा दोघेही अजूनही "दगडू" या व्यक्तिरेखेच्या अमलाखालीच असावेत असे वाटते. या चित्रपटातली 'देवा' ची एन्ट्री पासूनच अनेक प्रसंगात दगडूची छाप व्यक्तिरेखेवर अनेकदा जाणवते. दगडू हा जसा टपोरी टाईपचा असामी होता आणि एका ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडून तिला गटवतो असली कहाणी टाईमपास १ आणि २ मध्ये होती आणि अप्रतिम दिग्दर्शन-अभिनय आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे संगीत या पुंजीवर तगून गेली. पण हि किंवा असली कहाणी दर वेळेस प्रथमेश परब सोबत चालून जाइल या गैरसमजाला काय म्हणावं? तरी इथे स्पष्ट उल्लेख कसलाच नाही पण अंगुलीनिर्देश तसल्या प्रकारच्या कहाणीकडे आहे हे कविता लाड आणि मिलिंद पाठक यांच्या व्यक्तिरेखा अनेकदा प्रेक्षकांना जाणवून देतात. अभिनयासाठी उपेंद्र लिमयेंच्या ए सी पी कुलकर्णी या व्यक्तिरेखेचा उल्लेख करावाच लागेल कारण त्यांनी अगदी दमदारपणे एक ATS अधिकारी उभा केलेला आहे जो शून्यातून कथेच्या मूळ कारणाशी पोचतो. भलेही शेवट जरा दुखान्त या सदरात मोडत असला तरी तेथेही प्रेक्षकांची सहानुभूती हि देव म्हणजे मुख्य व्यक्तिरेखेला मिळायला हवी पण घेऊन जातात उपेंद्र लिमये.
मिताली मयेकरचा हा पहिलाच चित्रपट आणि तिला प्रत्येक गोष्टीत लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी इतक्यांदा महत्व दिलेले आहे कि ती कहाणीत नसताना पटकथेचा तोल जातो व कहाणीच भरकटण्याची शक्यता निर्माण होते. यात कोणताही हेतू नसावा हे स्पष्ट आहे पण अजाणतेपणी अस घडलंय खर. देवाची आणि अमृताची जोडी जमणे अन तुटणे या आणि इतक्याच हेतूत कुंभमेळा-दहशतवाद झालंच तर धर्मोल्लेख असल्या अनेक बाबींना विक्रम प्रधान हे स्पर्श करतात. या मागे कथा पुढे जावी इतकाच हेतू असला तरीही इतक्या चित्रविचित्र बाबींचे परस्परसंबंध दाखवताना किंवा चितारताना असे म्हणू विक्रम प्रधान हे शब्दश: अपयशी ठरलेत. या अपयशामागे इतर काहीही नसून चित्रविचित्र बाबींना स्पर्शण्यात सुटलेली कथेवरची पकड इतकेच एक कारण आहे. चिनार-महेश या संगीतकार जोडगोळीचा टाईमपास १ नंतरचा एक उत्तम प्रयत्न असा उर्फिचा उल्लेख करावाच लागेल.  
अभिनयात आधीच उल्लेखल्याप्रमाणे दगडू अका प्रथमेश परब आणि अमृता (मिताली मयेकर) या दोघांनीही आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे. मिताली मयेकर चा स्क्रीन प्रेझेन्स हा सुखावह  वाटतो. इशकझादे मधल्या परिणीती चोप्राची आठवण करून देते ती कित्येकदा. कारण तो हि अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट असला तरी तिला मुख्य बिंदूपाशी ठेवून तिच्या सभोवती पूर्ण कथा चित्रपटाची फिरली होती इशकझादेत. यशराजचा तो एक माइलस्टोन अशी त्याची ओळख आज असली तरी त्या यशात तिचा सहभाग हा सर्वोच्च होता. हि तुलना करावीशी वाटली कारण अमृताच्या व्यक्तिरेखेलाहि दिग्दर्शकाने तसेच अतिमहत्व दिलेले आहे. इतके कि तिच्या अपघातानंतर कहाणीवरची पकड सुटण्याइतकी ढिली पडते!!  
उर्फी हे टायटल का तर नाशिकचा कुंभमेळा अन त्या अनुषंगाने कथेत आलेला एक दहशतवादी हल्ला. त्यात जर मुख्य अभिनेत्याचा समावेश लेखकाला करायचा होता तर आधी त्याचा थोडातरी सहभाग प्रेक्षकांना पाटण्यासारखा दाखवायला नको?? एकदम त्याला आणून काय ते विशद करायला हा हिंदी सिनेमा आहे का? असले अनेक प्रश्न प्रेक्षकांसाठी विक्रम प्रधान सोडतात. याचे उत्तर बघणारे मराठी प्रेक्षक  कितपत शोधतात  हे बघण्यासारखे असेल
मिताली मयेकर ची मराठी चित्रपटातली एन्ट्री आश्वासक रित्या झालेली आहे. हि कथाच कदाचित तशी असल्यामुळे वाटत असावं कि काय हे नंतर तिच्या पुढील चित्रपटातून  कळेलच पण तिच्यासाठी आणि उपेंद्र लिमयेसाठी  मी चित्रपटाला 1* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. 

-समीर