शनिवार, १६ जानेवारी, २०१६

कार्टी काळजात घुसली


कार्टी काळजात घुसली (मराठी नाटक)

प्रशांत दामले fan फाउंडेशन या नावाने निर्मात्या सौ गौरी प्रशांत दामले या नवीन नाटक घेऊन आल्या असून एक उत्तम प्रयत्न असे या नाटकाचे वर्णन करता येईल.वसंत सबनीस हे या नाटकाचे लेखक असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचललेली आहे.होणार सून मधली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान या नाटकात मुख्य स्त्री भूमिकेत असून नाटक म्हणजे एखाद्या मालिकेसारख (वेळकाढू) प्रकरण नसून एक लाइव्ह अभिनय प्रकरण आहे हे समजून-उमजून तिने प्रशांतजींना समर्थपणे साथ दिलेली आहे.

कहाणी:
कार्टी काळजात घुसली म्हणजे बापापासून दुरावलेल्या एका मुलीची कथा जी आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते. वास्तविक बघता तेजश्री प्रधान हि नाटकात नायिका आहे असे म्हटल्यावर तिची आणि प्रशांतजींची जोडी कशी जमवली असेल याबाबत प्रेक्षकांना उत्कंठा वाटणे साहजिक आहे. पण लेखक वसंत सबनीस यांनी हि उत्कंठा पुरेपूर शमवली असून पहिल्या पंधरा मिनिटातच उत्तर मिळते प्रेक्षकांना.

अभिनय:
नाटकाभीनयाचे जागतिक विक्रमकर्ता प्रशांत दामले  हे संगीतकार के के आणि तेजश्री प्रधान हि त्यांची मुलगी कांचन यांच्या भूमिकेत असून त्या दोघांनी आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे.

प्रशांत दामले यांच्या केके चा उल्लेख विशेष करून त्यांच्या विनोदाच्या टायमिंग साठी. मान्य कि नाटक लिखित संहितेत असते पण तरीही त्यातील विनोदाला लाइव्ह प्रेक्षकांसमोर उभा करणे कथेतील विनोदाच्या टायमिंग चुकू देता आणि नाटकाचा मूळ विषय बघता मुळातील गंभीरतेच्या गाभ्याला धक्का लागू देता हे मुख्य अभिनेत्यासाठी निश्चितच कौतुकास्पद. प्रशांतजींचे कांचनसोबतचे काही प्रसंग हे कथेला पुढे सरकवण्यासाठी भावनात्मकदृष्ट्या आव्हानात्मक होते. ते हि त्यांनी अप्रतिम रित्या निभावून नेलेत. म्हणजे एकच व्यक्ती तीन तासांच्या तुटपुंज्या वेळात रंगमंचावर लाइव्ह प्रेक्षकांसमोर भावनात्मक (इमोशनल) प्रसंग निभावतो आणि संहितेतील विनोदाच्या फोडणीलाही पुरून उरतो हे निश्चितच कौतुकास्पद आहे.  आणि याच सोबत काही प्रसंगात प्रेक्षकांना त्यांच्या गायनकलेचेही दर्शन घडते

तेजश्री प्रधान हिने रंगवलेली भूमिका म्हणजे कांचन१८ वर्षांपासून वडलांपासून दुरावलेली एक मुलगी जेंव्हा परत आपल्या वडिलांना भेटते तेंव्हाची एका मुलीची दोलायमान मन:स्थिती तेजश्रीने अप्रतिम रित्या उभी केलेली आहे. काही प्रसंगात तिची भूमिका कथेला पुढे नेण्यासाठी एक सपोर्ट इतकीच मर्यादित आहे तर काही प्रसंग पूर्ण तिच्या भूमिकेच्या गांभीर्यावर उभे आहेत पण सांगण्यास कौतुक कि तिने समर्थपणे सगळे प्रसंग तोलले आणि निभावून नेलेले आहेत. होणार सून मधल्या जान्हवीमुळे तिला घरोघरी प्रसिद्धी मिळाली पण या नाटकामुळे तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळेल.

कोणत्याही नाटकात पटकथा एक महत्वाची भूमिका बजावते. या नाटकात भावनात्मक प्रसंग उभे करण्यात पटकथा आणि संवाद लेखक कमी पडले अशी शंका प्रेक्षकांना बाहेर निघताना येते. अर्थात व्यक्ती-दरव्यक्ती आकलन करण्याचा फरक असल्यामुळे असेल कदाचित पण मला असे वाटले म्हणून मी या नाटकाला प्रशांतजी आणि तेजश्री दोघांच्या अभिनयासाठी साडे तीन   [ /]* दिन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर                 

1 टिप्पणी: