सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

बाजीराव-मस्तानी


बाजीराव-मस्तानी

बाजीराव मस्तानी या दोघांवर सोशल साईट्सवर इतकी चर्चा घडलेली आहे कि या सिनेमाचा इतिहासाशी, ब्राह्मणांशी संबंध हे सोडून फक्त एक कलाकृती म्हणून याच एनालिसिस होण कठीण वाटते आहे पण तरीही संजय लीला भन्साळीला या अप्रतिम कलाकृतीबद्दल श्रेय हे विरोधकही देतील याचा भरवसा वाटतो. 

बाजीराव पेशवे हे शूर योद्धे होते हे मान्य पण त्यांच्याबद्दल महाराष्ट्राबाहेर त्यांचा उल्लेख शूर म्हणून न होता मस्तानी प्रकरणामुळे होतो. मी स्वत: गुजरात मध्ये काही वर्ष काढलेली आहेत आणि हे अनुभवलेलं आहे. त्यांची ब्राह्मण जात आणि मस्तानी या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांच्या शुरत्वावर कडी करतो हे मी बघितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी संजय लीला भन्साळी यांचे या मराठी मानसिकतेला अवघड विषयाला हात घातल्याबद्दल कौतुक कारण त्यांनी पूर्ण सिनेमात बाजीरावांचे  मस्तानीवर प्रेम होते ती त्यांची रखेल-अंगवस्त्र नव्हती  या वास्तविकतेवर भन्साळींनी फोकस केलेला आहे. बाजीरावांची मस्तानीशी झालेली पहिली भेट इथपासून सुरवात करून त्यांचे रंगलेले प्रेम इत्यादी अवघड विषयाला अप्रतिमरीत्या भन्साळीने हाताळलेल आहे.

बाजीराव पेशवे यांची झालेली मस्तानी या नर्तकीशी भेट अन त्या मस्तानीला तिच्या वडलांनी बाजीरावांना  केलेले नजर. तिचा पुण्यात/त्यांच्या घरात प्रवेश आणि शेवटी दोघांचाही झालेला (वेगवेगळा) मृत्यू या धाग्याभोवती विविध अंगाने फुलणारी कहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानी.नागनाथ इनामदार यांच्या "राऊ" या पुस्तकावर बेतलेली कहाणी असा उल्लेख पहिल्यांदाच आहे. मला अपेक्षा होती कि आधी घडलेला गदारोळ बघता भन्साळी "काल्पनिक कथा वास्तविकतेशी संबंध नाही" अशी सूचना आधी देईल. पण तसे काहीही घडले नाही.

काशीबाई साहेबांचा या कहाणीत आपोआप प्रवेश होतो कारण त्या श्रीमंतांच्या प्रथम पत्नी. त्यांचे आगमन कथेत झालावरही कथा मस्तानी आणि मस्तानीवर भाळलेला बाजीराव अशी न झुकता बाजीरावांचे शौर्य या गोष्टींवर फोकस करते या साठी भन्साळीचे खरोखर कौतुक.

बाजीरावांनी अवघ्या चाळीस वर्षांच्या जीवनात जवळपास सगळ्या प्रकारचे युद्धकौशल्य आत्मसात केले होते. मैदानी युद्धकलांत तर ते निपुण होतेच पण राजकारणी बाजूनेहि ते तरबेज होते. कथेत ओझरताच उल्लेख असला तरी निजामावर त्यांनी मिळवलेला विजय हा  त्यांच्या कुटनिति अन कावेबाज डावपेचात्मक राजकारणाचा अप्रतीम नमुना होता/आहे, अगदी फिरंग्यांनी त्यांच्या केम्ब्रिज विद्यापीठात अभ्यासण्याइतका. असल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला पडद्यावर उभे करणे हि  निश्चितच एक  कठीण गोष्ट होती. पण रणवीर सिंग कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या अभिनयात्मक कारकिर्दीतील अप्रतिम कामगिरी यात करून गेलाय. मस्तानीच्या प्रेमात पडलेला पण स्त्रीलंपट नसलेला अशी त्यांची योग्य अशी प्रतिमा रणवीर सिंग मुळे निर्माण होण्यास मदत होईल हे नक्की.

मस्तानीच्या भूमिकेत आहे दीपिका पदुकोण. मस्तानी हि रखेल नव्हती पण तिचा आणि श्रीमंतांचा विवाह झालेला होता असा उल्लेख भन्साळीला कदाचित इतिहासात सापडला नसावा. कारण त्या दोघांचा विवाह झाल्याच्या उल्लेख/प्रसंग सिनेमात नाही. पण श्रीमंत ज्या व्यक्तिमत्वावर भाळले असतील असे व्यक्तिमत्व पडद्यावर उभे करण्यात मात्र दीपिका पदुकोण यशस्वी होते हे नक्की. आपल्या सौंदर्याचा अभिमान असलेली एक स्त्री, युद्धकलानिपुण पण श्रीमंतांच्या रूपावर/व्यक्तिमत्वावर भाळलेली स्त्री उभे करणे हे एक कठीण काम होते, नानासाहेबांचे व्यक्तिमत्व कथेत आल्यावर त्यांच्या रूपाने त्यांच्यासकट सगळ्या पेशवे घराण्याचा विरोध सहन करताना श्रीमंतांवर  असलेली  निष्ठा  डळमळीत न होऊ देणारी स्त्री असल्या छटा फक्त तीन तासांत एका अभिनेत्याने पडद्यावर उभ्या करणे हे किचकट काम होते. पण दीपिका पुरून उरली दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर हे नक्की.  

काशीबाई राणीसाहेबांच्या   भूमिकेत आहेत प्रियंका चोप्रा. काशीबाईंची भूमिकाही एक कठीण भूमिका होती. घरात नवर्याला होत असलेला विरोध कमी करण्याचा प्रयत्न करत नवर्याच्या चुका पोटात घालून त्याला तोलामोलाची साथ देणारी एक कुलीन भार्या प्रियंकाने शब्दश: पडद्यावर उभी केलेली आहे. मस्तानीला समजून घेणारी पण तिने तिच्या मोठ्या बहिणीचा दर्जा देताच त्या दर्जाला नाकारणारी अन फक्त पतीपेमाने तुला आपलंस करते आहे हे तिला जाणवून देणारी राणी अप्रतिम रित्या प्रियंकाने उभी केलेली आहे.       

पिंगा अन मल्हारी या गाण्याला विविध कारणाने विरोध झाला. या गाण्यामुळे प्रतिमा खालावतेय या अन अश्या आशयाच्या पतिक्रिया मी तथाकथित पेशव्यांच्या वंशजांकडून वाहिन्यांवर बघितल्या. हे दोन गाणे अन माननीय काशीबाई साहेबांची प्रतिमा उभारण्यात दिग्दर्शकाने घेतलेली cinematic लिबर्टी आपण दुर्लक्षित करू पण तीन तासांची एक अप्रतिम ऐतिहासिक कथा विनादोष निर्माण करण्यात संजय लीला भन्साळी हे यशस्वी झालेत याचा आनंद होऊन मी चित्रपट ४१/२* (साडेचार) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर                     


रविवार, ६ डिसेंबर, २०१५

उर्फी-मराठी चित्रपट


लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान हे प्रथमेश परब (आपला टाईमपास मधला दगडू)  आणि नवीन तारका मिताली मयेकर यांना नवीन चित्रपटात घेऊन आले आहेत. मराठी चित्रपटाचा जीव म्हणजे "प्रेम" तर यात आहेच पण या बरोबरच मैत्री, कुंभमेळा आणि दहशवाद असल्या पूर्णपणे विरुद्ध कोनी विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो. प्रयत्न चांगला असला तरी प्रेक्षक कितपत स्वीकारतात हे बघणेबल राहील.
विक्रम प्रधान किंवा स्वत: प्रथमेश परब या दोघांपैकी कुणीतरी किंवा दोघेही अजूनही "दगडू" या व्यक्तिरेखेच्या अमलाखालीच असावेत असे वाटते. या चित्रपटातली 'देवा' ची एन्ट्री पासूनच अनेक प्रसंगात दगडूची छाप व्यक्तिरेखेवर अनेकदा जाणवते. दगडू हा जसा टपोरी टाईपचा असामी होता आणि एका ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडून तिला गटवतो असली कहाणी टाईमपास १ आणि २ मध्ये होती आणि अप्रतिम दिग्दर्शन-अभिनय आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे संगीत या पुंजीवर तगून गेली. पण हि किंवा असली कहाणी दर वेळेस प्रथमेश परब सोबत चालून जाइल या गैरसमजाला काय म्हणावं? तरी इथे स्पष्ट उल्लेख कसलाच नाही पण अंगुलीनिर्देश तसल्या प्रकारच्या कहाणीकडे आहे हे कविता लाड आणि मिलिंद पाठक यांच्या व्यक्तिरेखा अनेकदा प्रेक्षकांना जाणवून देतात. अभिनयासाठी उपेंद्र लिमयेंच्या ए सी पी कुलकर्णी या व्यक्तिरेखेचा उल्लेख करावाच लागेल कारण त्यांनी अगदी दमदारपणे एक ATS अधिकारी उभा केलेला आहे जो शून्यातून कथेच्या मूळ कारणाशी पोचतो. भलेही शेवट जरा दुखान्त या सदरात मोडत असला तरी तेथेही प्रेक्षकांची सहानुभूती हि देव म्हणजे मुख्य व्यक्तिरेखेला मिळायला हवी पण घेऊन जातात उपेंद्र लिमये.
मिताली मयेकरचा हा पहिलाच चित्रपट आणि तिला प्रत्येक गोष्टीत लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी इतक्यांदा महत्व दिलेले आहे कि ती कहाणीत नसताना पटकथेचा तोल जातो व कहाणीच भरकटण्याची शक्यता निर्माण होते. यात कोणताही हेतू नसावा हे स्पष्ट आहे पण अजाणतेपणी अस घडलंय खर. देवाची आणि अमृताची जोडी जमणे अन तुटणे या आणि इतक्याच हेतूत कुंभमेळा-दहशतवाद झालंच तर धर्मोल्लेख असल्या अनेक बाबींना विक्रम प्रधान हे स्पर्श करतात. या मागे कथा पुढे जावी इतकाच हेतू असला तरीही इतक्या चित्रविचित्र बाबींचे परस्परसंबंध दाखवताना किंवा चितारताना असे म्हणू विक्रम प्रधान हे शब्दश: अपयशी ठरलेत. या अपयशामागे इतर काहीही नसून चित्रविचित्र बाबींना स्पर्शण्यात सुटलेली कथेवरची पकड इतकेच एक कारण आहे. चिनार-महेश या संगीतकार जोडगोळीचा टाईमपास १ नंतरचा एक उत्तम प्रयत्न असा उर्फिचा उल्लेख करावाच लागेल.  
अभिनयात आधीच उल्लेखल्याप्रमाणे दगडू अका प्रथमेश परब आणि अमृता (मिताली मयेकर) या दोघांनीही आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे. मिताली मयेकर चा स्क्रीन प्रेझेन्स हा सुखावह  वाटतो. इशकझादे मधल्या परिणीती चोप्राची आठवण करून देते ती कित्येकदा. कारण तो हि अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट असला तरी तिला मुख्य बिंदूपाशी ठेवून तिच्या सभोवती पूर्ण कथा चित्रपटाची फिरली होती इशकझादेत. यशराजचा तो एक माइलस्टोन अशी त्याची ओळख आज असली तरी त्या यशात तिचा सहभाग हा सर्वोच्च होता. हि तुलना करावीशी वाटली कारण अमृताच्या व्यक्तिरेखेलाहि दिग्दर्शकाने तसेच अतिमहत्व दिलेले आहे. इतके कि तिच्या अपघातानंतर कहाणीवरची पकड सुटण्याइतकी ढिली पडते!!  
उर्फी हे टायटल का तर नाशिकचा कुंभमेळा अन त्या अनुषंगाने कथेत आलेला एक दहशतवादी हल्ला. त्यात जर मुख्य अभिनेत्याचा समावेश लेखकाला करायचा होता तर आधी त्याचा थोडातरी सहभाग प्रेक्षकांना पाटण्यासारखा दाखवायला नको?? एकदम त्याला आणून काय ते विशद करायला हा हिंदी सिनेमा आहे का? असले अनेक प्रश्न प्रेक्षकांसाठी विक्रम प्रधान सोडतात. याचे उत्तर बघणारे मराठी प्रेक्षक  कितपत शोधतात  हे बघण्यासारखे असेल
मिताली मयेकर ची मराठी चित्रपटातली एन्ट्री आश्वासक रित्या झालेली आहे. हि कथाच कदाचित तशी असल्यामुळे वाटत असावं कि काय हे नंतर तिच्या पुढील चित्रपटातून  कळेलच पण तिच्यासाठी आणि उपेंद्र लिमयेसाठी  मी चित्रपटाला 1* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. 

-समीर

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

तमाशा

तमाशा

दिग्दर्शक इम्तियाज आली हे आजच्या जमान्यातील पडद्यावर अन पडद्या बाहेर दोन्ही कडे (वेगवेगळी/एकत्र) गाजणारी जोडी रणबीर कपूर -दीपिका पादुकोण ला घेऊन हा नवीन सिनेमा घेऊन आलेले आहेत.लेखक देखील तेच आल्यामुळे या प्रयत्नाच्या प्रेक्षकांना वाटणाऱ्या सगळ्या यश-अपयशाचे धनी तेच एकटेच.

"काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजवण्यासाठी दिग्दर्शकाने पूर्ण कहाणी वाहून घेतलेली आहे. वेद वर्धन-सोहोनी (रणबीर कपूर) आणि तारा माहेश्वरी (दीपिका पदुकोण) यांची अपघाताने झालेली भेट अन त्या भेटीला पुढे आलेली प्रेमाची भरती या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे "तमाशा".

इम्तियाज आली स्वत:च लेखक आल्यामुळे कदाचित पण त्याने बर्याच ठिकाणी गोष्टी आपोआप समजतील अशी काळजी घेतल्याचे जाणवते. पण तरीही जो फरक पडायचा तो पडतोच. एक उदाहरण घेऊ, "तमाशा" हे शीर्षक का तर हे समजावताना त्याने वेद वर्धन-सोहोनीच्या पूर्वायुष्याचा संदर्भ वापरलेला/दिलेला आहे. त्याच्या पूर्वायुष्यातील आवडत्या गोष्टीत तमाशाचा समावेश करून त्याद्वारे त्याने त्या कलेला सरतेशेवटी तो आपले पोटाचे साधन कसे बनवतो हे बेमालूमपणे इम्तियाज manage करतो. एक हे हि उदाहरण घेऊ कि दिग्दर्शकच लेखक असला तरी काही गोष्टी समजावताना कसा कमी पडू शकतो, कसं/कुठे तर तारा माहेश्वरी आणि वेदची भेट होते, ताटातूट होते मान्य पण ताटातुटीच्या पाच वर्षांच्या कालखंडात (कालखंड दाखवलेला आहे) काहीही फरक पडत नाही?? मागील पानावरून पुढे अशी कहाणी त्यांची भेट झाल्यावर सरकते?? ती दिल्ली अन तो शिमला असे वेगवेगळ्या शहरातील असूनही?? इथे दिग्दर्शक प्रेक्षकांना "समजून जातील ब्वा" असे manage करतो. तारा माहेश्वरी या दीपिका पदुकोणच्या व्यक्तिरेखेच्या उल्लेख केवळ ती आहे इतपतच करावा लागेल कारण इम्तियाज आली आपल्याच "रॉकस्टार" पटाकडून इतका इम्प्रेस वाटतो कि तिला जास्त स्कोपच त्याने ठेवलेला नाही. बर्याच काळ तर ती कहाणीच्या बाहेरच असते.
या असल्या गोष्टी संगीतात दाबून जातात आणि प्रेक्षकांच्या स्म्रुतिपटलावरुन थिएटरच्या बाहेर पडताना पुसल्या जातात पण श्री रा.रा.ए आर रहमान हे पुन्हा एकदा पार्श्वसंगीत आघाडीवर अपयशी ठरलेले आहेत. दोन किंवा तीन गाणेही आहेत पण ते "सो सो" category त येतात.
इम्तियाज अली ने लेखक म्हणून कहाणी लिहिताना कहाणीचा हेतू ठरवताना गफलत केल्याचे जाणवते किंवा नंतर एका कहाणीच एका चित्रपटात रूपांतरण करताना जे बदल घडले असतील त्या बदलत कहाणी भरकटली असे वाटते. कारण काहीही असो पण कहाणी भरकटली बरेच काळ असे इम्प्रेशन घेऊन प्रेक्षक बाहेर पडतात. एक साधा मुलगा कला क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणारा मग घरच्यांच्या दबावाखाली झुकून
इंजी. इत्यादी क्षेत्रात नशीब आजमावलेला. मग तिथे यशस्वी झाल्यानंतर बॉलीवूडसदृश्य कर्मधर्मसंयोगाने तसलीच परिस्थिती बनून प्रेमात पडलेला. मग ताटातूट झालेला. या ताटातुटिचे कारण हि शब्दश: "हास्यास्पद" असलेला. हे कारण हास्यास्पद बनले कारण लेखक/दिग्दर्शक या कारणाची गहनता प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात सपशेल अपयशी ठरलेत. पियुष मिश्राच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख करावाच लागेल. कहाणी लहान मुलांना सांगणारा/समजावणारा एका म्हातार्याची व्यक्तिरेखा त्याने निभावलेली आहे. पण कहाणी पुढे सरकवण्यात इतक्या ठिकाणी त्याचा संदर्भ येतो कि जर तो कमी पडला असता तर अक्खा चित्रपटच हास्यास्पद बनला असता.

"काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजावण्याचा लेखक/दिग्दर्शक इम्तियाज अलीचा प्रयत्न त्याचे कमर्शियल रूपांतरण करताना भरकटल्याचे जाणवते. मी या चित्रपटाला १ स्टार १* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मुंबई-पुणे-मुंबई 2



मुंबई-पुणे-मुंबई=2 

मुंबई-पुणे-मुंबई या आपल्याच गाजलेल्या आधीच्या सिनेमाचा पार्ट-२ म्हणजेच सिक्वेल घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे आलेले असून आधीच्याच कहाणीला पुढे नेत त्यांनी एक उत्तम प्रयत्न सादर केलेला आहे. दिवाळीला एकमेकांसोबतच तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि त्यापैकी दोन मराठी पण सांगण्यात आनंद  कि दोन्ही मराठी चित्रपट अक्षरश: पुरून उरलेले आहेत राजश्रीच्या चित्रपटाला.  "कट्यार काळजात घुसली" आणि "मुंबई-पुणे-मुंबई २" हे सिद्ध करतात कि चांगले  मराठी चित्रपट असले तर आजच्याहि  जमान्यात  मल्टिप्लेक्सलाहि तिकीट मिळत नाही इतकी गर्दी खेचू शकतात. सुट्टी असो वा नसो पण मराठी चित्रपटांनी आजच्या जमान्यात तिकीट बारीवर शब्दश: अलोट गर्दी खेचणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे दोघंही आधीच्याच भागाप्रमाणे याही भागात असून त्यांनी त्यांची कहाणी पुढे नेलेली आहे आणि आधीच्या भागात  त्यांची नावे नव्हती फक्त एक मुंबईचा आणि एक मुंबईची अशी सारवासारव होती पण या भागात नामकरण करून गौतम प्रधान आणि गौरी देशपांडे यांची कहाणी नीटपणे मांडलेली आहे.
गौतम प्रधान हा पुण्याचा मुलगा आणि गौरी प्रधान हि मुंबईची मुलगी यांचा विवाहसोहळा संपन्न कसा होतो या धाग्याभोवती वेवेगळ्या अंगांनी फिरणारी कहाणी म्हणजे मुंबई-पुणे-मुंबई २. पण यात समाधान कि कहाणीत कोणतेही फिल्मी ट्विस्ट नाही. वास्तविक बघता अंगद म्हैसकर (अर्णव) च्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना अशी शंका बरेचदा येते आणि त्यातही अभिनेत्री तिच्या निर्णयाबद्दल पक्की राहात नाही त्यामुळे या संशयाला बळकटी मिळते पण सरतेशेवटी चित्रपट "शेवट गोड" करून संपतो. पण सतीश राजवाडे हे लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना थोडेफार कन्फ्युज करण्यात यशस्वी ठरलेले आहेत.
चित्रपटाची पहिल्या भागातील लोकप्रियता लक्षात घेता दुसया भागाची लोकप्रियता आधीच आगाऊ ठरवून/अपेक्षित धरून सतीश राजवाडेंनी बरेचसे प्रयोग करून बघितलेत मार्केटींगचे या भागात. बाकी जाऊ देऊ पण खानविलकर कि कोणीतरी या बिल्डर्सची जाहिरात करून देण्याची पद्धत त्यांनी वापरली. 
अविनाश-विश्वजित या संगीतकार जोडीलाच पहिल्या भागाप्रमाणे याहि भागात राजवाडेंनी रिपिट केलेले आहे. पण पहिल्या भागात "कधी तू" आणि "का कळेना" या दोनच गाण्यांनी जो प्रभाव या जोडीने निर्माण केला होता त्यांच्या १०%हि या वेळेस नाही. मान्य असो वा नसो पण या दोन गाण्यांचे पहिल्या भागाच्या यशातील योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते. या वेळेस त्यांना ती जादू री-क्रिएट करणे अजिबात जमलेले नाही.
प्रेम आणि त्यानंतर लग्नाची/लग्नासाठी/लग्नापर्यंत इत्यादी इत्यादी जुळवाजुळव हा नाही म्हटले तरी सर्व वयोगटांत इंटरेस्टिंग विषय आहे. यावर मराठी चित्रपटात प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे संवाद (dialogues ) पण अश्विनी  शेंडे  या लेखिकेने पटकथा आणि संवाद हि दुहेरी जबाबदारी सांभाळूनही दोन्हीकडे उत्तम न्याय केलेला आहे. त्यातही त्यांच्या संवाद लेखनासाठी त्यांचे विशेष कौतुक.
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीला सांभाळत सतीश राजवाडेंनी त्या दोघांकडूनही उत्तम अभिनय करवून घेतलाय पण मागील भागातली अविनाश-विश्वजित हि जोडी संगीत आघाडीवर सपशेल अपयशी ठरलेली आहे. काही प्रसंगात "कधी तू" हे background म्हणून वापरले असते तरी चालले असते असे उगाचच प्रेक्षकांना बरेचदा वाटून जाते. मला सगळंच आवडल विशेष करून संवाद पण संगीताने माझा भ्रमनिरास केला म्हणून मी चित्रपटाला साडे तीन (३१/२)* स्टार देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर


बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

प्रेम रतन धन पायो


करिष्माई निर्माते-दिग्दर्शक सुरज बडजात्या हे नवीन चित्रपट त्यांची आवडती व्यक्तिरेखा "प्रेम" आणि या वेळेस प्रेम च्या भूमिकेत सलमान खान दुहेरी भूमिकेत असल्या तिकीट बारीवर गाजण्याच्या दृष्टीने परिपूर्ण मसाल्या सहित आलेले आहेत. पहिल्या विकेंडलाच गाठलेला शंभर कोटींचा आकडा हा दाखवतो कि जनता आधीपासूनच फक्त बडजात्याच्या करिष्म्यावर विश्वास ठेवून आहे. पण कितीही नाकारले तरी रिपीट ऑडीयंस हि सुरज बडजात्या फिल्मची मागील काहीवेळची बनलेली  खासियत  या वेळेस कितपत चालते यावर या सिनेमाचे यश अवलंबून असेल. दिग्दर्शकाचे आणि मुख्य अभिनेत्याच्या जोडीचे प्री-इम्प्रेशनच इतके जबरदस्त कि पहिल्या तीन दिवसातच हिटचा दर्जा चित्रपटाने मिळवला पण यशस्वी होण्याचा दर्जा या  नंतर सुरु होईल, आणि तो मिळेल का हे अनुभवणे मजेशीर राहील !!!! 

सुरज बडजात्याचा सिनेमा म्हणजे पूर्ण शाकाहारी थोडक्यात पूर्ण कुटुंबाला सोबत नेउन देखील कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला आवडेल असे काही ना काही सापडणारा एक दुर्मिळ सिनेमा असे आजवर इम्प्रेशन होते. मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ  है आणि  विवाह   असल्या  एक से एक उत्तम कलाकृती सादर करणारा हा गडी. अर्थात मै प्रेम कि दिवानी हु सारखा अपवाद पण या केस मध्ये हा अपवाद देखील "सन्माननीय अपवाद"  आपोआप बनतो.  

सलमान खान दुहेरी भूमिकेत आणि त्यातही एक भूमिका राजाची आणि एक त्याच राज्यातल्या प्रजाजनाची. या दोन भूमिकांचा आपसात-सहकलाकारांशी  मेळ जमवताना लेखक स्वत:च कन्फ्युज झालाय का अशी शंका प्रेक्षकांना येते.  या दोन पैकी एक भूमिका जवळपास तीनही तासभर कहाणीच्या बाहेर असूनही हे विशेष. कहाणीलेखक-पटकथा लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता या चारही महत्वाच्या भूमिकांत सुरज बडजात्याच असल्यामुळे जसे विवाहच्या केसमध्ये उत्कंठावर्धक आणि तारुण्यपिटिकेला गवसणी घालणारी आगळी- वेगळी कथा असली वाहवा त्याने सगळ्या वयोगटातून त्याने मिळवली  त्याचप्रमाणे या  वेळेस रिपीट ऑडीयंस तर  सोडा पण मागील पुण्याईमुळे मिळालेला ऑडीयंसहि छी-थु करेल अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.  

लेखकाने cinematic लिबर्टी इत्यादी इत्यादी संकल्पनांचा आधार घेत  प्रेक्षकांना गृहीत धरणे हे हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन नाही पण सुरज बडजात्या सारख्या प्रथितयश (!!!!!!) लेखक-दिग्दर्शकाने प्रेक्षकांना मूर्ख समजण्या इतपत कमतरता ठेवाव्यात याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही. जास्त नाही आपण एकंच छोट  उदाहरण घेऊ एक राजाच्या कुटुंबातल्या आंतरिक बाबी भलेही बाहेरचा व्यक्ती राजवाड्यात त्यांचा आत्मज म्हणून शिरला तरीही इतक्या सहजा-सहजी बाहेरपर्यंत झिरपाव्यात?? बाकी प्रसंग हि सांगता येतील गृहीत धरल्याचे पण आधीची पुण्याई बघता इतकच सध्या पुरे बाकी बघणाऱ्या प्रेक्षकांनी आपापले ठरवावे.

आलोक नाथ हा सुरज बडजात्याचा लकी चार्म वाटायचा मला कारण त्याच्या गाजलेल्या प्रत्येक सिनेमात तो एक महत्वपूर्ण भूमिकेत होता."मै प्रेम कि दिवानी हु" मध्ये नव्हता आणि असा सिनेमा होता हे कोणाला आठवते का या प्रश्नाच्या उत्तरातच मला असे का वाटते याचे उत्तर आहे का?? या सिनेमातही आलोक नाथ नाही !!!! वास्तविक बघता अनुपम खेरच्या जागी त्याला बसवता आल असत पण.........

मुख्य अभिनेत्री म्हणून सोनम कपूर आहे पण तिला प्रोमोसाठी वापरलेल्या गाण्यात कंबर हलवणे सोडून इतर काही महत्व नाही. सहाय्यक भूमिकेत नील नितीन मुकेशहि आहे पण त्याला तोंडी लावण्यापुरतेही महत्व नाही.
२००६ सालच्या विवाह मध्ये स्व.रवींद्र जैन यांचा म्हणजेच एका मेन स्ट्रीम चित्रपट क्षेत्रात नवीन संगीतकाराचा  वापर करून त्यांनी दिलेल्या संगीताच्या बळावर चित्रपट यशस्वी करून दाखवल्या नंतर सुरज बडजात्याची हिंमत वाढली अन या वेळेस त्याने संगीतासाठी चक्क  हिमेश रेशमियाचा वापर केला. पण ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा कितीही फुगला तरी कसोटीत त्रिशतक मारू शकेल का?? यातच जाणकारांना रेशमिया महाशयांना वापरणे योग्य कि अयोग्य  समजून जायला हवे. 

चित्रपटाला मी अर्धा स्टार देईन अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी आणि दिग्दर्शकाच्या पूर्वपुण्याईसाठी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

तलवार


२००८ सालच्या आरुषी तलवार "ऑनर किलिंग" या गाजलेल्या प्रकरणावर मेघना गुलजार या घेऊन आल्या आहेत "तलवार". या गाजलेल्या प्रकरणात काय घडले असेल याची उत्सुकता त्या काळात शिगेला पोचली होती. नव्हे मिडियाने पोचवली होती. त्यात काय घडले असेल याची नाट्यमय कहाणी म्हणजे “तलवार”.
सध्या निकाल लागलेल्या त्या प्रकरणावर पूर्णपणे आधारित आहे हा चित्रपट. आरुषी तिचे आई-वडील अन नोकर हेमराज यांना त्या काळात मिडीयाने लोकप्रिय (?) बनवले होते.   जर ते "ऑनर किलिंग" असेल तर त्यात काय घडले असेल? मुळात ऑनर किलंग असेल कि नसेल? इत्यादी थिअरिजला स्पर्श करत सरते शेवटी CBI या तपाससंस्थेतील अंतर्गत राजकारणात/लाथाळ्यात तिच्या आई-वडिलांना झालेली शिक्षा हि निर्दोष असूनही झाली होती/आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याइतपत डिटेल समीक्षण करते. त्यासाठी लेखक विशाल भारद्वाजचे आणि दिग्दर्शक मेघना गुलजारचे खरोखर कौतुक.
या कहाणीच्या आत थोडक्यात शिरताना भारतीय नोकरशाहीत अंतर्गत राजकारण किती खोलवर रुजलेले आहे कि ते असल्या मोठमोठ्या प्रकरणांच्या कोर्टाच्या निकालावर तपासाद्वारे प्रभाव टाकू शकते हे दिसून येते. लेखक विशाल भारद्वाजने भारतीय नोकरशाहीवर कोणतीही टिकाटिप्पणी करण्याचे टाळून माझ्यामते कहाणीला भरकटण्यापासून वाचवलेले आहे. आरुषीच्या निकालावर कोणतीही थेट टिप्पणी न करता कहाणी पूर्णपणे त्या तपासाभोवती फिरते आणि शेवटी फक्त निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून प्रेक्षकांना ठरवण्यास बाध्य करते. भारतीय नोकरशाहीत राजकारण आहे पण ते असे दृष्टीकोनात्मक पद्धतीने सीबीआय सारख्या तपास संस्थेत प्रभाव टाकत असेल हे खरोखर धक्कादायक आहे.

इरफान खान हा पोलिस अधिकारी अश्विन कुमार आणि नीरज काबी हा रमेश टंडन पक्षी आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार यांच्या भूमिकेत आहेत. कोंकणा सेन-शर्मा हि आरुषी उर्फ श्रुती टंडन (सिनेमात) हिच्या आईच्या भूमिकेत आहे. इरफान खान आणि नीरज काबी हे उत्कृष्टरित्या आपापल्या भूमिकांना वठवतात कारण सिनेमा पूर्णवेळ या दोघांभोवतीच फिरतो.
मेघना गुलजारचे कौतुक करावेच लागेल कारण ती विशाल भारद्वाज सोबत सहपटकथा लेखिकाही आहे आणि कहाणी कुठेही संथ बनून प्रेक्षक कंटाळणार नाहीत याची काळजी तिने लेखक सोबतीने घेतलेली पदोपदी जाणवते. आरुषीच्या मृत्यूसंदर्भात दुसरी थियरी मांडताना म्हणजे ज्यामुळे डॉ राजेश तलवारला शिक्षा झाली ते विषद करताना कहाणी वरील पकड सुटण्याची पूर्ण संधी होती. पण त्या मुळ कारणाला विषद करणारी जी मिटिंग असते त्यात (धर्मप्रचारक) विनोद पेरणी करून त्या विनोदाखाली ते कारण तिने व्यवस्थित हाताळल आहे.   
आरुषी प्रकरण मीडियानेच मोठे केले होते २००८ साली आणि ऑनर किलिंगचा मुलामा देऊन वाढवले होते पण चित्रपटात विषद केलेली दुसरी थियरी देखील शक्य होती आणि कदाचित खरीही असू शकते. आरुषीची कहाणी चित्रपट रुपात प्रेक्षकांसमोर आली म्हणजे भविष्यात सध्या गाजणारे शिना बोरा प्रकरण हि भविष्यात येइलच याची खात्री वाटते.

मी चित्रपटाला विशाल भारद्वाजची कथा/पटकथा आणि मेघना गुलजार चे दिग्दर्शन यांच्या उत्कृष्टतेसाठी मुख्यत्वे तीन ३* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

मराठी - दगडी चाळ





मराठी-दगडी चाळ

"दगडी चाळ" या दोन शब्दांनी सगळ्यात आधी काय आठवते? तर मुंबईतला राजकारणी बनलेला डॉन अरुण गवळी अन त्याच्या कारवाया. कारण दगडी चाळ हा मुंबईतला भायखळा भागातला भाग हा त्याचा अड्डा किंवा घर होते कैक काळ. त्यामुळे दिग्दर्शकाने कितीही स्पष्ट पाटी दिली (सुरु होण्या आधी) तरी चित्रपटाच्या नावावरून आणि एका मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आणि बाकी डीटेल्स वरून प्रेक्षकांना काय तो अंदाज लागतोच.

दगडी चाळ आणि १९९६च्या आसपास असलेली तिथली मुंबईतली दहशत अन या दहशतीखाली फुलणारे प्रेम या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे दगडी चाळ.   

अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे नायक व नायिका म्हणून कहाणीला लाभलेले आहेत आणि मकरंद देशपांडे हे डॅडी उर्फ अरुण गवळी च्या भूमिकेत आहेत.मकरंद देशपांडे यांनी अगदी अप्रतिम रित्या दगडी चाळ मधला डॉन डॅडी उभा केलेला आहे. त्यात राजकारणात घुसल्यामुळे कि काय पण अरुण गवळी च्या इमेजला धक्का न लावता त्याला थोडं उच्च पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अगदीच त्याचे निर्दोष असणे सिद्ध करणे हा हेतू नसला तरी त्याच्या प्रतिमेला उंचावणे हा हेतू आहे आणि मकरंदजी यात दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरेपूर उतरतात. पूजा सावंत हिच्या "सोनल" या भूमिकेचा उल्लेख करावाच लागेल कारण तिने उत्तम रित्या सगळी जबाबदारी निभावलेली आहे.
चंद्रकांत कणसे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. नवीन वाटताहेत कारण या आधी त्यांचे नाव मी तरी कधीच ऐकले नाही. त्यांचा हेतू अरुण गवळी यांची प्रतिमा उंचावणे अन जमल्यास प्रेक्षकांचे मनोरंजनहि करावे असा सीमित जाणवतो बर्याच प्रसंगात.

अमित राज यांचे संगीत चित्रपटाला असून अजय ताम्हाणे आणि प्रविण कमले यांची गीते आहेत. गाणे सगळे ठीक आहेत पण "धागा धागा" या हर्ष वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेल्या गाण्याचा उल्लेख हा करावाच लागेल कारण ते गाणे शब्दश: अप्रतिम आहे. पूजा सावंत हिचे त्या  गाण्यातले सौंदर्य लक्षवेधक आहे.

मोरया मोरया हे सुरवातीचे गाणेही उत्तम असले तरी धागा धागा च्या सुरवातीच्या दोन ओळींचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर बर्याच ठिकाणी वापर आहे. कदाचित त्यामुळेच ते गाणे आपोआप लक्षात राहते प्रेक्षकांना.

मराठी सिनेमा अगदी डॉनची कहाणी वगेरे असला तरी "प्रेम" या कल्पनेपासून सुटलेला नाही. पण कहाणीत अजिबात टिकलेला नाही अभिनयाने तरला असला तरी मुळ कहाणीच  ठिसूळ असल्यामुळे काय बोलणार? त्यामुळे मी या चित्रपटाला मला पूजा सावंत बेहद्द आवडते म्हणून केवळ तिच्या प्रयत्नासाठी १* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर