रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

तलवार


२००८ सालच्या आरुषी तलवार "ऑनर किलिंग" या गाजलेल्या प्रकरणावर मेघना गुलजार या घेऊन आल्या आहेत "तलवार". या गाजलेल्या प्रकरणात काय घडले असेल याची उत्सुकता त्या काळात शिगेला पोचली होती. नव्हे मिडियाने पोचवली होती. त्यात काय घडले असेल याची नाट्यमय कहाणी म्हणजे “तलवार”.
सध्या निकाल लागलेल्या त्या प्रकरणावर पूर्णपणे आधारित आहे हा चित्रपट. आरुषी तिचे आई-वडील अन नोकर हेमराज यांना त्या काळात मिडीयाने लोकप्रिय (?) बनवले होते.   जर ते "ऑनर किलिंग" असेल तर त्यात काय घडले असेल? मुळात ऑनर किलंग असेल कि नसेल? इत्यादी थिअरिजला स्पर्श करत सरते शेवटी CBI या तपाससंस्थेतील अंतर्गत राजकारणात/लाथाळ्यात तिच्या आई-वडिलांना झालेली शिक्षा हि निर्दोष असूनही झाली होती/आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याइतपत डिटेल समीक्षण करते. त्यासाठी लेखक विशाल भारद्वाजचे आणि दिग्दर्शक मेघना गुलजारचे खरोखर कौतुक.
या कहाणीच्या आत थोडक्यात शिरताना भारतीय नोकरशाहीत अंतर्गत राजकारण किती खोलवर रुजलेले आहे कि ते असल्या मोठमोठ्या प्रकरणांच्या कोर्टाच्या निकालावर तपासाद्वारे प्रभाव टाकू शकते हे दिसून येते. लेखक विशाल भारद्वाजने भारतीय नोकरशाहीवर कोणतीही टिकाटिप्पणी करण्याचे टाळून माझ्यामते कहाणीला भरकटण्यापासून वाचवलेले आहे. आरुषीच्या निकालावर कोणतीही थेट टिप्पणी न करता कहाणी पूर्णपणे त्या तपासाभोवती फिरते आणि शेवटी फक्त निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून प्रेक्षकांना ठरवण्यास बाध्य करते. भारतीय नोकरशाहीत राजकारण आहे पण ते असे दृष्टीकोनात्मक पद्धतीने सीबीआय सारख्या तपास संस्थेत प्रभाव टाकत असेल हे खरोखर धक्कादायक आहे.

इरफान खान हा पोलिस अधिकारी अश्विन कुमार आणि नीरज काबी हा रमेश टंडन पक्षी आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार यांच्या भूमिकेत आहेत. कोंकणा सेन-शर्मा हि आरुषी उर्फ श्रुती टंडन (सिनेमात) हिच्या आईच्या भूमिकेत आहे. इरफान खान आणि नीरज काबी हे उत्कृष्टरित्या आपापल्या भूमिकांना वठवतात कारण सिनेमा पूर्णवेळ या दोघांभोवतीच फिरतो.
मेघना गुलजारचे कौतुक करावेच लागेल कारण ती विशाल भारद्वाज सोबत सहपटकथा लेखिकाही आहे आणि कहाणी कुठेही संथ बनून प्रेक्षक कंटाळणार नाहीत याची काळजी तिने लेखक सोबतीने घेतलेली पदोपदी जाणवते. आरुषीच्या मृत्यूसंदर्भात दुसरी थियरी मांडताना म्हणजे ज्यामुळे डॉ राजेश तलवारला शिक्षा झाली ते विषद करताना कहाणी वरील पकड सुटण्याची पूर्ण संधी होती. पण त्या मुळ कारणाला विषद करणारी जी मिटिंग असते त्यात (धर्मप्रचारक) विनोद पेरणी करून त्या विनोदाखाली ते कारण तिने व्यवस्थित हाताळल आहे.   
आरुषी प्रकरण मीडियानेच मोठे केले होते २००८ साली आणि ऑनर किलिंगचा मुलामा देऊन वाढवले होते पण चित्रपटात विषद केलेली दुसरी थियरी देखील शक्य होती आणि कदाचित खरीही असू शकते. आरुषीची कहाणी चित्रपट रुपात प्रेक्षकांसमोर आली म्हणजे भविष्यात सध्या गाजणारे शिना बोरा प्रकरण हि भविष्यात येइलच याची खात्री वाटते.

मी चित्रपटाला विशाल भारद्वाजची कथा/पटकथा आणि मेघना गुलजार चे दिग्दर्शन यांच्या उत्कृष्टतेसाठी मुख्यत्वे तीन ३* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

मराठी - दगडी चाळ





मराठी-दगडी चाळ

"दगडी चाळ" या दोन शब्दांनी सगळ्यात आधी काय आठवते? तर मुंबईतला राजकारणी बनलेला डॉन अरुण गवळी अन त्याच्या कारवाया. कारण दगडी चाळ हा मुंबईतला भायखळा भागातला भाग हा त्याचा अड्डा किंवा घर होते कैक काळ. त्यामुळे दिग्दर्शकाने कितीही स्पष्ट पाटी दिली (सुरु होण्या आधी) तरी चित्रपटाच्या नावावरून आणि एका मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आणि बाकी डीटेल्स वरून प्रेक्षकांना काय तो अंदाज लागतोच.

दगडी चाळ आणि १९९६च्या आसपास असलेली तिथली मुंबईतली दहशत अन या दहशतीखाली फुलणारे प्रेम या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे दगडी चाळ.   

अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे नायक व नायिका म्हणून कहाणीला लाभलेले आहेत आणि मकरंद देशपांडे हे डॅडी उर्फ अरुण गवळी च्या भूमिकेत आहेत.मकरंद देशपांडे यांनी अगदी अप्रतिम रित्या दगडी चाळ मधला डॉन डॅडी उभा केलेला आहे. त्यात राजकारणात घुसल्यामुळे कि काय पण अरुण गवळी च्या इमेजला धक्का न लावता त्याला थोडं उच्च पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अगदीच त्याचे निर्दोष असणे सिद्ध करणे हा हेतू नसला तरी त्याच्या प्रतिमेला उंचावणे हा हेतू आहे आणि मकरंदजी यात दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरेपूर उतरतात. पूजा सावंत हिच्या "सोनल" या भूमिकेचा उल्लेख करावाच लागेल कारण तिने उत्तम रित्या सगळी जबाबदारी निभावलेली आहे.
चंद्रकांत कणसे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. नवीन वाटताहेत कारण या आधी त्यांचे नाव मी तरी कधीच ऐकले नाही. त्यांचा हेतू अरुण गवळी यांची प्रतिमा उंचावणे अन जमल्यास प्रेक्षकांचे मनोरंजनहि करावे असा सीमित जाणवतो बर्याच प्रसंगात.

अमित राज यांचे संगीत चित्रपटाला असून अजय ताम्हाणे आणि प्रविण कमले यांची गीते आहेत. गाणे सगळे ठीक आहेत पण "धागा धागा" या हर्ष वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेल्या गाण्याचा उल्लेख हा करावाच लागेल कारण ते गाणे शब्दश: अप्रतिम आहे. पूजा सावंत हिचे त्या  गाण्यातले सौंदर्य लक्षवेधक आहे.

मोरया मोरया हे सुरवातीचे गाणेही उत्तम असले तरी धागा धागा च्या सुरवातीच्या दोन ओळींचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर बर्याच ठिकाणी वापर आहे. कदाचित त्यामुळेच ते गाणे आपोआप लक्षात राहते प्रेक्षकांना.

मराठी सिनेमा अगदी डॉनची कहाणी वगेरे असला तरी "प्रेम" या कल्पनेपासून सुटलेला नाही. पण कहाणीत अजिबात टिकलेला नाही अभिनयाने तरला असला तरी मुळ कहाणीच  ठिसूळ असल्यामुळे काय बोलणार? त्यामुळे मी या चित्रपटाला मला पूजा सावंत बेहद्द आवडते म्हणून केवळ तिच्या प्रयत्नासाठी १* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर     

किस किस को प्यार करू (?)

किस किस को प्यार करू (?)