२००८ सालच्या आरुषी
तलवार "ऑनर किलिंग" या गाजलेल्या प्रकरणावर मेघना गुलजार या घेऊन आल्या आहेत
"तलवार". या गाजलेल्या प्रकरणात काय घडले असेल याची उत्सुकता त्या काळात
शिगेला पोचली होती. नव्हे मिडियाने पोचवली होती. त्यात काय घडले असेल याची नाट्यमय
कहाणी म्हणजे “तलवार”.
सध्या निकाल लागलेल्या
त्या प्रकरणावर पूर्णपणे आधारित आहे हा चित्रपट. आरुषी तिचे आई-वडील अन नोकर हेमराज
यांना त्या काळात मिडीयाने लोकप्रिय (?) बनवले होते. जर ते "ऑनर किलिंग" असेल तर त्यात काय
घडले असेल? मुळात ऑनर किलंग असेल कि नसेल? इत्यादी थिअरिजला स्पर्श करत सरते शेवटी
CBI या तपाससंस्थेतील अंतर्गत राजकारणात/लाथाळ्यात तिच्या आई-वडिलांना झालेली शिक्षा
हि निर्दोष असूनही झाली होती/आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याइतपत डिटेल समीक्षण
करते. त्यासाठी लेखक विशाल भारद्वाजचे आणि दिग्दर्शक मेघना गुलजारचे खरोखर कौतुक.
या कहाणीच्या आत थोडक्यात
शिरताना भारतीय नोकरशाहीत अंतर्गत राजकारण किती खोलवर रुजलेले आहे कि ते असल्या मोठमोठ्या
प्रकरणांच्या कोर्टाच्या निकालावर तपासाद्वारे प्रभाव टाकू शकते हे दिसून येते. लेखक
विशाल भारद्वाजने भारतीय नोकरशाहीवर कोणतीही टिकाटिप्पणी करण्याचे टाळून माझ्यामते कहाणीला भरकटण्यापासून वाचवलेले आहे. आरुषीच्या निकालावर कोणतीही थेट टिप्पणी न करता कहाणी पूर्णपणे त्या तपासाभोवती फिरते आणि शेवटी फक्त निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण
करून प्रेक्षकांना ठरवण्यास बाध्य करते. भारतीय नोकरशाहीत राजकारण आहे पण ते असे दृष्टीकोनात्मक
पद्धतीने सीबीआय सारख्या तपास संस्थेत प्रभाव टाकत असेल हे खरोखर धक्कादायक आहे.
इरफान खान हा पोलिस
अधिकारी अश्विन कुमार आणि नीरज काबी हा रमेश टंडन पक्षी आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार
यांच्या भूमिकेत आहेत. कोंकणा सेन-शर्मा हि आरुषी उर्फ श्रुती टंडन (सिनेमात) हिच्या
आईच्या भूमिकेत आहे. इरफान खान आणि नीरज काबी हे उत्कृष्टरित्या आपापल्या भूमिकांना
वठवतात कारण सिनेमा पूर्णवेळ या दोघांभोवतीच फिरतो.
मेघना गुलजारचे कौतुक
करावेच लागेल कारण ती विशाल भारद्वाज सोबत सहपटकथा लेखिकाही आहे आणि कहाणी कुठेही संथ
बनून प्रेक्षक कंटाळणार नाहीत याची काळजी तिने लेखक सोबतीने घेतलेली पदोपदी जाणवते.
आरुषीच्या मृत्यूसंदर्भात दुसरी थियरी मांडताना म्हणजे ज्यामुळे डॉ राजेश तलवारला शिक्षा
झाली ते विषद करताना कहाणी वरील पकड सुटण्याची पूर्ण संधी होती. पण त्या मुळ कारणाला
विषद करणारी जी मिटिंग असते त्यात (धर्मप्रचारक) विनोद पेरणी करून त्या विनोदाखाली ते कारण तिने व्यवस्थित
हाताळल आहे.
आरुषी प्रकरण मीडियानेच
मोठे केले होते २००८ साली आणि ऑनर किलिंगचा मुलामा देऊन वाढवले होते पण चित्रपटात विषद
केलेली दुसरी थियरी देखील शक्य होती आणि कदाचित खरीही असू शकते. आरुषीची कहाणी चित्रपट
रुपात प्रेक्षकांसमोर आली म्हणजे भविष्यात सध्या गाजणारे शिना बोरा प्रकरण हि भविष्यात
येइलच याची खात्री वाटते.
मी चित्रपटाला विशाल
भारद्वाजची कथा/पटकथा आणि मेघना गुलजार चे दिग्दर्शन यांच्या उत्कृष्टतेसाठी मुख्यत्वे
तीन ३* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर


