सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

बार बार देखो

निर्माता धर्मा प्रोडक्शन्स (जोहर फॅमिली) आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर नवीन चित्रपट घेऊन आलेले आहेत, बार बार देखो. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्याच सुपरस्टार शाहरुख खानच्या “कभी अलविदा ना केहना” मध्ये पण एका चांगल्या कन्सेप्टची निरर्थक हाताळणी मुळे वाट लागली होती, त्या अनुभवाची आठवण धर्मा प्रोडक्शन्सला ‘बार बार देखो’ करून देणार हे नक्की.   



वास्तविक बघता  comparatively  वेगळी कल्पना होती. प्रेमात पडलेले जोडपे लग्न करण्याचा निर्णय घेते आणि या निर्णयात नवरदेवाची महत्वाकांक्षा आड येऊन लग्न तुटते. या कथेला भूत-भविष्य-वर्तमान या तिन्ही काळात निर्माता-दिग्दर्शकाने फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न लोकांना कितपत आवडतो यावर कमर्शियल याचे यश अवलंबून असेल.

सिद्दार्थ मल्होत्रा (करण जोहरचे “स्टुडंट ऑफ इयर”चे फाईंड) आणि कतरीना कैफ ये दोघे नायक नायिका म्हणून कहाणीला लाभलेले आहेत. कहाणी जरा वेगळी होती, भूतकाळात गुंतून न राहता आणि भविष्य काळाची व्यर्थ चिंता न करता वर्तमान काळाला पूर्ण 100% देऊन वर्तमान काळाला जगा असा संदेश देण्याचा लेखक श्री राव यांचा प्रामाणिक प्रयाण होता. मान्य कि सिद्धार्थ मल्होत्राने प्रयत्न पूर्ण केला पण तो पुरा पडला नाही. माझ्या मते तो एक चांगला मॉडेल आहे. त्याने कॅमेऱ्यासमोर येऊन आठ-दहा फोटो काढून निघून जाण्यातच त्याची भलाई आहे. 'आपण अभिनय करू शकतो' असा आव त्याने आणू नये.    अभिनेत्री कतरीना कैफ बद्दल काय लिहिणार, सुपरस्टार सलमान खानच्या मुळे वर आलेली एक व्यक्ती. इतक्या वर्षांनंतरहि इंग्रजी-हिंदी भाषेतले ट्रान्सफॉर्मेशन अभिनयात तिला जमू नये??

नित्या मेहरा या नवीन दिग्दर्शकाचे दिग्दर्शन बार बार देखो ला मिळालेले आहे. नित्या मेहरा या सहपटकथा लेखकही आहेत. दुर्दैवाने हे सोडून त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे काहीही विशेष नाही.
बऱ्याच ठिकाणी त्यांची अननुभवी हाताळणी नडली असे बघताना वाटून जाते पण नंतर नेटवर फिरताना मला लक्ष्यात आलं कि अनिल कपूरच्या '24' या मालिकेच्या दिग्दर्शकही त्याच आहेत. म्हणजे  "बंदी मे दम है" अगदीच नवीन नाही. कहाणीचा ठिसूळपणा हाच वाट लागण्यामागे मुख्य मुद्दा असावा.
करण जोहर ने एक दोन नव्हे चक्क पाच संगीतकारांच्या वेगवेगळ्या गाण्यांसाठी उपयोग केलेला आहे. आणि फॉरेन लोकेशन्स वगेरे वगेरे (पडद्यावरील) श्रीमंती थाटमाटहि करण्यात कसूर केलेली नाही. पण.....
कोणताही सिनेमा का बघावा किंवा का बघू नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. मला बार बार देखो मध्ये कतरीना कैफचा 'भारतीय लूक' हि गोष्ट सोडून इतरही काहीही उल्लेखनीय जाणवले नाही. मला समजले नसेल असे असेल कदाचित, पण मी अर्धा स्टार (1/2*) 'बार बार देखो' ला देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर


शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

अकिरा

अकिरा

निर्माते/दिग्दर्शक ए आर मुर्गाडोस सोनाक्षी सिन्हा आणि अनुराग कश्यप अभिनीत एक नवीन चित्रपट घेऊन आले असून टायटल आहे 'अकिरा'. अकिरा हा एक संस्कृत शब्द असून त्याचा मराठीत अर्थ होतो 'डौलदार'. आणि शब्दश: सोनाक्षीने हा अर्थ या भूमिकेत ओतलेला आहे हे सांगण्यास विशेष.

या कहाणीत ए आर मुर्गाडोसने साऊथ पद्धतीने तीन तासांच्या वेळात बऱ्याच कहाण्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एसिड अटॅक, प्रेम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कहाणीतील नाट्य, महाविद्यालयीन जीवन या कोनांना स्पर्श करत शेवटी होणारा कहाणीचा ट्विस्टरुपी अंत म्हणजे अकिरा.




अभिनयात सोनाक्षी सिन्हा (अकिरा शर्मा), कोंकणा सेन-शर्मा (राव्या) आणि अनुराग कश्यप (ए सी पी राणे) या सगळ्यांनी आपापल्या भूमिकांना व्यवस्थित न्याय दिलेला आहे पण बाहेर निघताना लक्षात राहतो तो खलनायक अनुराग कश्यपच. एक खलनायक कसा असावा? तर खलनायकाने त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना त्या भूमिकेचा/व्यक्तीचा द्वेष करण्यास भाग पाडावे. या मुद्द्यावर अगदी चपखलपणे बसलेली भूमिका म्हणजे अनुराग कश्यपचा ए सी पी राणे. सिस्टीम मधील लूपहोल्सचा फायदा उठवत वरची कमाई करणारा एक ए सी पी आणि त्या कमाईला पचवताना होणारे अनेक लफडे सांभाळणारा एक पोलिसवाला अप्रतिम रित्या अनुराग कश्यपने उभा केलेला आहे. आजपर्यंत अनुराग कश्यप मला एक दिग्दर्शक\निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून माहित होता पण इतका चांगला अभिनेता असेल हे मला नवीनच होतं. त्याने भविष्यात अभिनयाचा सिरियसली विचार करायला हरकत नाही माझ्यामते.     

ए आर मुर्गाडोस म्हटलं जी आपोआप आठवतो गजिनी. त्यानंतरही त्याने हॉलिडे केला अक्षयसोबत पण जी छाप गजिनीची पडली तिची बरोबरी करणे जमले नव्हते हॉलिडेला. या वेळेसही त्याने प्रयत्न उत्तम केलेला आहे यात वाद नाही पण सोनाक्षीची भूमिका फिजिकली फिट अभिनेत्रीची दाखवणे या भागाला महत्व देताना तिच्या अभिनयाकडे दुर्लक्ष झालेले आहे त्याचे. मान्य कि फिजिकली फिट अभिनेत्री हि त्या कहाणीची गरज होती पण आमचा अतुल कुलकर्णी एका छोट्याशाच भूमिकेत जी छाप सोडून जातो तसलं तिला जमलं नसतं काय? याचा निर्णय प्रेक्षक घेतीलच पण हे दुर्लक्ष कदाचित भोवेल.

खलनायकांसाठी कोणताही सिनेमा बघण्याचे हे दिवस नाहीत, मान्य. पण तरीही अनुराग कश्यपने खरोखर कमाल केलेली आहे अकिरात. त्याच्या अभिनयासाठी अन कहाणीच्या वेगळेपणासाठी मी अकीराला साडे तीन (3 1/2*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर