आशिष वाघ हे नवीन दिग्दर्शक
मराठीत पदार्पण करीत असून मिस्टर एंड मिसेस सदाचारी हा सिनेमा घेऊन आलेले आहेत. टायटल
वरून वाटत असल्याप्रमाणे सदैव चांगले आचरण करणारे जोडपे यासम काहीही प्रकार नसून मुख्य
नायक "शिवा सदाचारी" आणि त्याची लग्नापर्यंतची हि कहाणी म्हणून नाव मिस्टर
एंड मिसेस सदाचारी. वास्तविक बघता आशिष वाघ हे मराठी चित्रपट वितरण व्यवसायातील मोठे
नाव पण यावेळेस स्वत:च दिग्दर्शक बनलेत. एका चित्रपट वितरकाला पटकथेच्या वेगाचा अंदाज
नसावा हे दुर्दैवी!!! पण तसे घडलंय खर.
कहाणी:
शिवा सदाचारी (वैभव
तत्ववादी) हा एक अभ्यासातल्या अपयशामुळे सतत वर्षानुवर्षे घरच्यांच्या आणि त्यातही
मुख्यत्वे वडलांच्या रोषाला बळी पडलेला एक मुलगा. त्याला झालेले प्रेम. या प्रेमाची
त्याने केलेली adjustment आणि सरतेशेवटी हुशार भावाला पछाडत घरच्या संकटात वडलाना केलेली
मदत अशी एक खूपच कन्फ्युजिंग कहाणी यात बघायला मिळेल.
अभिनय:
शिवा सदाचारी (वैभव
तत्ववादी) आणि प्रार्थना बेहेरे हे दोघे मुख्य भूमिकेत यात आहेत म्हणजेच मिस्टर आणि
मिसेस. पण मोहन जोशी यांनीही शिवाच्या वडलांच्या भूमिकेत छाप सोडलेली आहे. वैभव म्हणजे
मराठीतला सुपरस्टार एकदम अभिनयात "बाप" माणूस असे समजत कि काय पण पटकथा आणि
कथालेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी त्याला इतके अति-महत्व दिलेले आहे कि बस. प्रेक्षक
त्रासण्याइतके अति महत्व. मान्य कि बाजीराव-मस्तानी मध्ये चिमाजी अप्पाची भूमिका वैभवने
अप्रतिम निभावली पण म्हणून तो लंगड्या कथा-पटकथेला तारून नेईल या अपेक्षेला काय म्हणावे?
प्रार्थना
बेहेरेने "अती" न करता तिच्या वाट्याला आलेली भूमिका व्यवस्थित निभावलेली
आहे. तिचे सौंदर्य हीच तिची अभिनयापेक्षाही जमेची बाजू आहे हे जाणून तिने तिच्या भूमिकेसोबत
पूर्ण न्याय केलेला आहे. पण बाहेर निघताना लक्षात राहतात ते मोहन जोशीच. आधी आपल्या
नावडत्या मुलाचा त्यांचा दुस्वास मग आयुष्याच्या उत्तरार्धात आवडत्या मुलाने वार्यावर
सोडल्यावर नावडता मुलगा जेंव्हा सावरतो तेंव्हा ते जाणवल्यावर त्यांचे कबुल करणे हे
प्रेक्षकांवर छाप सोडून जाते.
दिग्दर्शन:
आशिष वाघ हे चित्रपट
वितरण व्यवसायातून चित्रपट दिग्दर्शनात उतरलेले आहेत. तरीही त्यांनी इतके विविध प्रयत्न
एकसाथ करावे याचे अप्रूप. प्रेमकहाणी-मित्रमेळा-प्रेमासाठी नायकाची इतरांना मदत-
शिवजयंती इत्यादी इत्यादी विविध कोनाने
कहाणी तीनही तास त्यांनी फिरवलेली आहे. शेवटी शेवटी लव जिहाद कडेही कहाणी वाकेल अशी
शंका "नीता" च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना येते पण आशिष वाघ तिथे दया करतात
कदाचित प्रेक्षकांवर. पण त्यांनी पहिलाच प्रयत्न पुरेपूर निभावण्याचा
पूर्ण प्रयत्न केलेला आहे दक्षिण भारतीय पद्धतीचे फायटिंग सिवेन्सेस वगेरे जबरदस्त
जुळून आलेत पण.....
संगीत:
संगीत या चित्रपटाचा
एकमेव stong point. पंकज पडघन यांनी अप्रतिम संगीत दिलेले आहे सगळ्या गाण्यांना. पंकज
पडघन म्हणजे दुनियादारी-तू हि रे-क्लासमेट्स-गुरु चे संगीत दिग्दर्शक. त्यांनी त्यांची
संगीत दिग्दर्शक म्हणून ओळख आता निर्माण केली असून, भविष्यात अजय-अतुल नंतर मराठीत
संगीत दिग्दर्शक म्हणून पंकज पडघन यांचे नाव आदर मिळवेल हे नक्की.
मराठीत सगळंच उत्तम
असावे लागते आणि थोडीशीही काडी इकडची तिकडे झाली तर मराठीत जमत नाही. एका पूर्वाश्रमीच्या
चित्रपट वितरकाकडून संथ पटकथा हि चूक नव्हे गुन्हा घडलेला आहे या चित्रपटात म्हणून
हा चित्रपट फक्त उत्कृष्ट संगीताच्या शिदोरीवर तरून जाईल काय?? याचे उत्तर काळ देइलच
पण मी संगीत आवडले म्हणू पाव (१/४)* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

