शनिवार, २३ जुलै, २०१६

कबाली

दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली  हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही.

साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते. पण लिंगा किंवा शिवाजी सारखी कहाणीची विशेष पातळी गाठणे लेखक/दिग्दर्शक प रणजित याना जमलेले नाही हे नक्की. आपला हिंदी कहाणी लेखक असता तर मलेशियातील स्थायिक भारतीयांच्या व्यथा/ चिनी घुसखोरीमुळे त्यांना मलेशियात होणारा त्रास\नायकाची प्रेमकहाणी\ त्याचा जीवनातील संघर्ष इत्यादी इत्यादी इत्यादी बाबीना एकमेकांत गुंतवत चार ते पाच हिंदी चित्रपटांच्या कहाण्या तयार होतील अशी कहाणी बनली असती. पण "सब कुछ रजनीकांत" हि कहाणी साकारणे जमले नसते.

सुपरस्टार रजनीकांत हा कबालीश्वरन या डॉन च्या मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षक हे फक्त त्याला बघण्यासाठीच गर्दी करणार याचा अंदाज आधीच असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत अति-महत्व आहे. साधीशी गोष्ट सिनेमाच्या पहिल्याच पंधरा मिनिटात 25 वर्षे तुरुंगात घालवून तो बाहेर येतो अन या बाहेर येण्यात त्याचे जे स्वागत त्याच्या मंडळींकडून होते ते स्वागत अन त्याचे पार्श्वसंगीत याची पातळी  अतिशय उच्चं असल्याचे बाकी चित्रपटभर बघताना जाणवून जाते. वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्याची नायकाची भूमिका\प्रेम वगैरे करण्याची इच्छा असेल असे मला तरी वाटत नाही पण चाहत्यांच्या आग्रहाखातर तो करत असावा आणि या हि वयात तो बरोबरीच्या इतरांना पुरून उरतो हे जगाला आपोआप जाणवत असेल. चिनी अभिनेत्यांसोबतची त्याची जुगलबंदी, या वयातीलहि फिजिकल फिटनेस वगैरे कौतुक त्याच्या बद्दल आहेच. त्याच्या वयाचा उल्लेख करण्यामागे त्याचा फिजिकल फिटनेस आणि सिनेमाच्या सुरवातीच्या श्रेय नामावलीत त्याचा उल्लेख "पदमविभूषण रजनीकांत" असं होतो हे मला विशेष वाटलं. आपली मराठमोळी राधिका आपटे त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे पण जेवायला बसल्यावर भात-भाजी-पोळी असा सगळा जामानिमा ताटात असल्यावर कितीही व्यवस्थित कापलेला कांदा दिला तरी कुणी जेवल्यानंतर "किती सुंदर कापला कांदा" असा उल्लेख करतो का?? आणखी काय बोलावे!!!   

प रणजित यांचे दिग्दर्शन कबालीचे आहे. लिंगा किंवा गेला बाजार शिवाजी मध्ये राजनीकांतची ची की "लार्जर दॅन लाईफ" इमेज होती तशी इमेज निर्माण करण्यात कबाली कमी पडतो हे मात्र जाणवते. भलेही कहाणीला इतक्या विविध कोनांनी फिरवत प्रयत्न तसा केला असेल हे जाणवते पण तो प्रयत्न कमी पडतो हे मात्र नक्की. पण एक दिग्दर्शक हाच जेंव्हा लेखक असतो आणि कहाणीत नायकालाच महत्व द्यायचे आहे हि requirement त्याला अन निर्मात्याला क्लियर असते तेंव्हाच असे होत असावे. संतोष नारायणन यांचे संगीत कबालीचे आहे. दक्षिण भारतीय पद्धतीचे तीन किंवा चार गाणे आहेत पण या गाण्यांपेक्षा त्यांनी पार्श्वसंगीतात कमाल केलेली आहे. जिथे, जसे, जितके पाहिजे तसेच पार्श्वसंगीत आहे.

सुपरस्टार रजनीकांत हा एक अभिनेता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून लोकांना आवडतच असेल. जर तीनही तास पडद्यावर कहाणी वगैरे इतर क्षुल्लक गोष्टींना नोटीस न करता त्याला बघण्याची तयारी असेल, तर तुमच्यासाठीच हा चित्रपट आहे.  मी माझ्यातर्फे कबालीला 2* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर 

शनिवार, ९ जुलै, २०१६

सुलतान

सध्या आभासी जगाचा जमाना आहे, मग एखादा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड चालत असल्याचा आभास निर्माण करता येत असेल काय? हो कदाचित, कारण शंका असल्यास सुलतान हा चित्रपट बघून घ्यावा.चित्रपटाबद्दल आक्षेपार्ह काही नसेलही पण अति-पूर्वप्रसिद्धी?? यावर थोडा तरी चाप यशराज ने बसवावा माझ्यामते, सर्वाधिक विकेंड कलेक्शन - 500 कोटीच्या क्लबमधल्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक - सुपरस्टार सलमान च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड इत्यादी इत्यादी इत्यादी  पूर्वप्रसिद्धीने भुलून कदाचित, पण  सध्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हींचे दर आकाशाला भिडलेत. बरे असतीलही पण तितका प्रतिसाद चाहत्यांचा असेल काय?? शंकास्पद बाब आहे कारण मी जो शो बघितला त्या माझ्या दुपारच्या शोला जवळपास 70% खुर्च्या रिकाम्या होत्या.


सुलतान अली खान (सुपरस्टार सलमान खान) आणि आरफा (अनुष्का शर्मा) या दोन्ही कुस्तीपटूंच्या प्रेमाची घडलेली\बी-घडलेली आणि शेवटी पूर्ण झालेली कहाणी म्हणजे सुलतान.

सुपरस्टार सलमान खान हा कुस्तीपटू- रेसलर अश्या भूमिकेत आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ज्या शिताफीने त्याने दोन्ही भूमिका त्यातल्या विविधांगी कंगोऱ्यांसकट निभावून नेल्यात त्याला तोड नाही. कितीही चांगला दिग्दर्शक असता आणि समजा तुषार कपूर सुलतान खान असता तर......जस्ट इमॅजिन!!! सलमान ने खरोखर खूप मेहनत घेतल्याचे जाणवते बरेचदा विशेष करून क्लायमॅक्स ला. 
अनुष्का शर्मा(आरफा) या महिला कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे. सलमान खानच्या भूमिकेसमोर तिची भूमिका मुख्य अभिनेत्री असूनही आपोआप एक सहाय्यक अभिनेत्री इतकी मर्यादित होते. रणदीप हुडा काही काळ सहाय्यक भूमिकेतून दर्शन देतो आणि छोटीशी भूमिका असली तरी तिची नोंद घ्यायला भाग पडतो.

अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कहाणी लेखक. आणि आदित्य चोप्रा बरोबर सहपटकथा लेखकही. आणि सांगण्यास समाधान की त्यांनी कुठेही आपल्या कर्तव्यात कसूर केलेली नाही. तसे पाहता सुलतानचा रेसलिंग क्लायमॅक्स हा सलमान ने कितीही मेहनत घेतली असती आणि दिग्दर्शक अननुभवी-कन्फ्युज्ड असता तर त्या मुख्य सीनची वाट लागली असती. पण त्यांनी सगळे व्यवस्थित निभावून नेले.  

विशाल-शेखर या जोडगोळीने संगीत सुलतानला आहे.  संगीतही अगदी उत्कृष्ट वगैरे नसले तरी अगदीच टाकाऊ कॅटेगोरीतही येत नाही. उलट ज्या शिताफीने सुलतान चा टायटल ट्रॅक आणि सच्ची-मुच्ची या दोन गाण्यांचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर वापर आहे ते निश्चितच  कौतुकास्पद आहे. आणि एक महत्वाचे सुरवातीलाच सलमान खानच्या एंट्रीला जे पार्श्वसंगीत आहे, काही सेकंदच, पण त्यासाठी विशेष कौतुक. कारण सलमानच्या एंट्रीलाच जर त्या भूमिकेची छाप पडली नसती तर पुढे जे इम्प्रेशन क्लायमॅक्स मुले क्रिएट होते त्यात फरक पडला असता हे नक्की

सलमान च्या चित्रपटांत तोच असतो डोळ्यांसमोर तीनही तास, दबंग 1-2, रेडी, वॉन्टेड, किक, बजरंगी भाईजान हे काही ठळक उदाहरणे, कहाणी काहीही असो पण पडद्यावर पूर्णवेळ तोच असतो आणि या परंपरेला सुलतान अपेक्षेप्रमाणे पुढे नेतो, अर्थात इथे कहाणीच तशी होती म्हणा पण तरीही ........ 
सुपरस्टार सलमान खान खरोखरच कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी अभिनयाच्या दृष्टीने सुलतान मध्ये करून गेलाय. त्याचा धर्म - पूर्वायुष्यातील त्याच्या चुका - त्याचा प्रेमभंग इत्यादी इत्यादी पूर्वग्रह आधी करून घेतलेला असेल तर हा चित्रपट बघणाऱ्यांसाठी नाही. मान्य की एक व्यक्ती म्हणून त्याच्याबद्दल व्यक्ती-दरव्यक्ती प्रेक्षकांचे मत बदलेल पण तरीही कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता जर हा चित्रपट बघितलात तर आवडण्याचीही दाट शक्यता आहे.  बाकी डिटेल्स बाजूला ठेवू पण ज्या तन्मयतेने त्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी कुस्तीपटू-रेसलर उभा केलेला आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच त्याच्या जाणवणाऱ्या प्रचंड मेहनतीसाठी मी  माझ्यातर्फे सुलतानाला   पाच पैकी चार  (4*) स्टार देतो. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर